
फोटो सौजन्य - Social Media
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती C. P. Radhakrishnan प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे राज्यपाल Jishnu Dev Varma, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणारे हे विद्यापीठ राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
जुलै २०२२ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाने उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिझाइन तसेच अल्पकालीन कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे विविध केंद्रे कार्यरत आहेत.
विद्यापीठाने उद्योग क्षेत्राशी मजबूत भागीदारी निर्माण केली असून पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. तसेच ‘रुबिक फ्रान्स’च्या सहकार्याने ‘बॅचलर ऑफ डिझाईन’सारखे अत्याधुनिक अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य सेवेशी संबंधित वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने ‘जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले असून यात आयटीआयशी संबंधित विविध उपक्रमांचे प्रदर्शन सादर होणार आहे. यामध्ये टोयोटा किर्लोस्कर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, ऍटलास, दासयू एव्हिएशन तसेच स्वदेश फाउंडेशनसारख्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या यशोगाथाही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
याशिवाय ‘कोड विदाउट बॅरियर’ या उपक्रमांतर्गत मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या सहकार्याने राज्यातील १० हजार महिला शिक्षक व विद्यार्थिनींना एआय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना जनरेटिव्ह एआय क्षेत्रात सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा हा पहिला दीक्षांत समारंभ केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नसून राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.