
iit alumini
IIT alumnus viral post 2026: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये प्रवेश मिळवणे हे देशातील लाखो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थी कित्येक वर्षे रात्रं-दिवस मेहनत करतात. पण, जेव्हा आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलेला एखादा विद्यार्थी म्हणतो की, त्याच्यासाठी हा प्रवास कोणत्याही यशापेक्षा एका ओझ्यासारखा होता, तेव्हा काय? नुकतीच IIT वाराणसीच्या एका माजी विद्यार्थ्याची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांनी सांगितले की, इंजिनिअरिंगच्या अभ्यासात त्यांचे कधीच मन रमले नाही आणि पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या विषयापेक्षा पूर्णपणे वेगळे क्षेत्र निवडून करिअर घडवले. या पोस्टने सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला उधाण आणले आहे.
IIT वाराणसीचे माजी विद्यार्थी आकाश संपूर्णानंद पांडे यांनी सोशल मीडियावर आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटले की, इंजिनिअरिंग हा त्यांचा कधीच आवडीचा विषय नव्हता. त्यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये ते बहुधा शेवटच्या बाकावर बसायचे आणि त्यांचा बहुतांश वेळ इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित पुस्तके वाचण्यात जायचा. इंजिनिअरिंगच्या पुस्तकांपेक्षा त्यांची आवड या विषयांमध्ये अधिक होती.
आकाश यांच्या मते, त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण केवळ पदवी मिळावी म्हणूनच पूर्ण केले. आकाश म्हणतात की, ‘IIT मधील ४ वर्षांचा अभ्यास त्यांच्यासाठी तुरुंगासारखा होता’. ते परीक्षेच्या एक-दोन दिवस आधीच पुस्तके उघडायचे आणि केवळ पास होण्यापुरतीच तयारी करायचे. त्यांनी जवळपास ७.५ जीपीए (GPA) राखून ठेवला होता, जेणेकरून ते कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र राहू शकतील. तरीही, त्यांचा खरा कल नेहमीच इतर विषयांकडेच राहिला.
कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, पण हळूहळू इंजिनिअरिंगपासून पूर्णपणे अंतर निर्माण केले. आता ते आपल्या करिअरमध्ये एका वेगळ्या दिशेने पुढे गेले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ४ वर्षांच्या पदवीला आपल्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय बनू दिले नाही पाहिजे. कोणाची आवड जर दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात असेल, तर त्याने त्याच दिशेने पुढे गेले पाहिजे, असे त्यांचे मानणे आहे.
आकाश यांच्या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेक लोकांनी म्हटले की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचे करिअर निवडण्याचा अधिकार आहे आणि पदवी ही आयुष्यभराचे बंधन नसते. तर दुसऱ्या बाजूला, काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा लाखो विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहतात, तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने त्या संधीला गांभीर्याने न घेणे योग्य म्हणता येणार नाही.
या घटनेने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की, कॉलेजची पदवीच एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण करिअर ठरवते का? आजच्या काळात अनेक जण इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेस केल्यानंतर पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात यशस्वी करिअर घडवत आहेत. बदलत्या काळात लोक आपल्या आवडीला, कौशल्याला आणि आत्मसमाधानाला तितकेच महत्त्व देऊ लागले आहेत, जितके एखाद्या प्रतिष्ठित पदवीला दिले जाते.