
stanford
IIT vs Stanford admission : जर तुम्हाला कोणी सांगितले की, एका विद्यार्थ्याला JEE सारख्या कठीण परीक्षेत ३६० पैकी केवळ ५३ गुण मिळाले आहेत, तर हे ऐकताच तुम्ही विचार कराल की आता त्याला कोणत्याही मोठ्या संस्थेत प्रवेश मिळू शकणार नाही. परंतु, एक असा विद्यार्थी आहे ज्याने जेईई परीक्षेत केवळ ५३ गुण मिळवले होते आणि आज त्याने जगातील टॉपच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे. हे ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे सत्य आहे.
वास्तविक, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी जस्टिन साटो याने एका लिंक्डइन पोस्टद्वारे आपल्या यशाची कहाणी शेअर केली आहे. याच कारणामुळे तो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
आपल्या JEE परीक्षेचा स्कोअर जाहीर करताना या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला परीक्षेत केवळ ५३ टक्के गुण मिळाले होते. या दरम्यान त्याने स्पष्ट केले की,त्याचा उद्देश स्वतःच्या यशाची बढाई मारणे नसून, भारतातील इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांची पातळी किती कठीण आहे आणि येथील विद्यार्थ्यांमध्ये किती तीव्र स्पर्धा असते, हे दाखवणे हा आहे.
सध्या जस्टिन साटो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स (भौतिकशास्त्र) चे शिक्षण घेत आहे. अलीकडेच त्याने ‘Skarmy’ नावाचा एक स्टार्टअप देखील सुरू केला आहे. लिंक्डइनवर आपली JEE मार्कशीट शेअर करताना त्याने लिहिले की, कमी गुण मिळूनही त्याला अमेरिकेतील ३ टॉप युनिव्हर्सिटींमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, त्याने पुन्हा स्पष्ट केले की, त्याचा उद्देश स्वतःचे कौतुक करून घेणे नसून, भारतातील इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांची कठीण पातळी आणि येथील विद्यार्थ्यांची प्रतिभा जगासमोर आणणे हा होता.
Study Tips: अभ्यास करूनही परीक्षेनंतर लगेच विसरून जाता? मग ‘या’ ५ साध्या ट्रिक्स नक्की वापरून बघा
जस्टिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE परीक्षा देतात, तर तिथे जागा अत्यंत मर्यादित असतात. अशा परिस्थितीत निवडीची टक्केवारी १ टक्क्यापेक्षाही कमी असते. त्याचे असे मानणे आहे की, याच कारणामुळे JEE ची गणना जगातील सर्वात आव्हानात्मक प्रवेश परीक्षांमध्ये केली जाते.
जस्टिनने सांगितले की, अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठे केवळ परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करत नाहीत. तिथे शैक्षणिक कामगिरीसोबतच संशोधन (Research), प्रोजेक्ट्स, वैयक्तिक यश, नेतृत्व क्षमता, सामाजिक उपक्रम आणि वैयक्तिक निबंध अशा अनेक गोष्टींचे मूल्यमापन केले जाते. याउलट, IIT सारख्या संस्थांमध्ये प्रवेश प्रामुख्याने JEE परीक्षेतील कामगिरीवरच अवलंबून असतो. याच कारणामुळे दोन्ही देशांची प्रवेश प्रक्रिया एकमेकांपासून खूप वेगळी आहे.
भारतीय इंजिनिअर्सचे कौतुक करताना जस्टिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे व्यावसायिक करत आहेत. त्याने हे देखील सांगितले की, त्याचा स्टार्टअप भविष्यात भारतात आपला विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच त्याने भारतातील विद्यार्थ्यांना आणि तरुण इंजिनिअर्सना इंटर्नशिपसाठी आपल्याशी जोडले जाण्याचे आमंत्रणही दिले आहे.