
internet
Exam Internet Ban:२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम (Telegram) ॲपवर लावलेली तात्पुरती बंदी सध्या जोरदार चर्चेत आहे. परीक्षेच्या संदर्भातील खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, टेलिग्रामला ३० जून २०२६ पर्यंत त्यांचे ‘मैसेज एडिट फीचर’ (Message Edit Feature) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून आधीच पाठवलेले संदेश एडिट करून संभ्रम पसरवता येणार नाही.
परंतु, परीक्षेदरम्यान एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा इंटरनेटवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगातील अनेक देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षांच्या काळात सोशल मीडिया आणि थेट इंटरनेटच बंद करण्याची पद्धत बऱ्याच काळापासून सुरू आहे.
अल्जीरिया: परीक्षेदरम्यान सोशल मीडिया आणि इंटरनेटवर बंदी घालणाऱ्या देशांमध्ये अल्जीरिया आघाडीवर आहे. येथील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील ‘बॅकलॉरिएट’ (Baccalaureate) परीक्षा सुरू असताना देशभरात इंटरनेट आणि फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तात्पुरते बंद केले जातात. प्रश्नपत्रिका लीक होणे आणि कॉपीच्या घटना रोखणे हा यामागचा सरकारचा उद्देश असतो.
मॉरिटानिया: या आफ्रिकन देशामध्येही राष्ट्रीय परीक्षांच्या काळात कोणतीही हाय-टेक कॉपी किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प केली जाते.
सूडान: सूडानमध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळतो. परीक्षेच्या वेळेत विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये आणि पारदर्शकता टिकून राहावी यासाठी इंटरनेट सेवांवर तात्पुरती बंदी घातली जाते.
Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!
२१ जून २०२६ च्या नीट परीक्षेसाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय जरी मोठा असला, तरी भारतात याआधीही स्थानिक आणि राज्य स्तरावर इंटरनेट सेवा मर्यादित करण्यात आल्या आहेत.
राजस्थान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या सरकारी भरती परीक्षांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पेपर लीक रोखण्यासाठी अनेकदा ‘मोबाईल इंटरनेट’ (Mobile Internet) काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
सायबर सुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, इंटरनेट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु हा पेपर लीक किंवा कॉपीसारख्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा (Permanent Solution) नाही.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया बंद करण्यापेक्षा परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करणे हेच भविष्यातील सर्वात प्रभावी पाऊल ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.