
RE NEET
NEET UG Re-Exam 2026: २१ जून २०२६ रोजी नीट यूजीची फेरपरीक्षा पार पडली. ५ हजारांहून अधिक केंद्रांवर २० लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र, यंदाच्या फेरपरीक्षेने विद्यार्थ्यांचा संयम, वेग आणि संकल्पनांच्या (कॉन्सेप्ट्स) खोलीची परीक्षा घेतली.
‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड’ (AESL) चे नॅशनल अकॅडमिक डायरेक्टर (मेडिकल) नबीन कार्की यांच्या मते, नीट यूजीच्या या फेरपरीक्षेने स्पर्धेचा नूरच बदलून टाकला आहे. या पेपरचा समावेश ‘मध्यम ते कठीण’ श्रेणीत केला जाईल. पेपरमध्ये पाठांतरापेक्षा विश्लेषण आणि आकडेमोडीवर जास्त भर देण्यात आला होता. या बदलाचा थेट परिणाम नीट यूजीच्या निकालावर होणार आहे. अवघड प्रश्नांमुळे ऑल इंडिया कोटाचा कट-ऑफ पूर्वीच्या अंदाजापेक्षा बराच खाली घसरू शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
नबीन कार्की (AESL) यांच्या विश्लेषणानुसार, २१ जून रोजी झालेला री-नीटचा पेपर ३ मे रोजी झालेल्या पहिल्या सत्राच्या तुलनेत खूपच कठीण होता. आधीचा पेपर सरळ आणि सोपा होता, तर या पेपरने विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचा सखोल वेध घेतला.
भौतिकशास्त्र (Physics): संपूर्ण पेपरमध्ये फिजिक्सचा भाग सर्वात कठीण आणि वेळखाऊ ठरला. हा पेपर मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, मॉडर्न फिजिक्स आणि थर्मोडायनामिक्स यांसारख्या मुख्य विषयांभोवती फिरत राहिला. ॲप्लिकेशन-बेस्ड आणि मोठ्या न्यूमेरिकल प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांवर वेळेचा प्रचंड ताण आला, ज्यामुळे अनेक मुलांना हा विभाग वेळेत पूर्ण करता आला नाही.
रसायनशास्त्र (Chemistry): केमिस्ट्रीचा विभाग देखील खूप वेगळा आणि कठीण होता. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकापेक्षा जास्त संकल्पना एकत्र करून विचारलेले प्रश्न आणि लांबलचक आकडेमोड होती. दुसरीकडे, ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये थेट प्रश्न विचारण्याऐवजी ‘रिएक्शन मेकॅनिझम’च्या सखोल ज्ञानाची चाचणी घेण्यात आली.
जीवशास्त्र (Biology):
बायोलॉजीचा विभाग नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आधार आणि सर्वाधिक स्कोअरिंग झोन ठरला. हा पेपर मुख्यत्वे एनसीईआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित होता. यामध्ये जेनेटिक्स, फिजिओलॉजी, रिप्रोडक्शन आणि इकॉलॉजी यांसारख्या धड्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, जूलॉजीमधील काही प्रश्नांचे पर्याय खूप फिरवून विचारलेले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
सरकारी मेडिकल कॉलेजमधील जागांसाठी ऑल इंडिया कोटा अंतर्गत जनरल कॅटेगरीचा कट-ऑफ यंदा खाली घसरून ५९० ते ६०० गुणांच्या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ नबीन कार्की यांनी वर्तवला आहे. त्यामुळे ही नीट परीक्षा तेच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात जे पाठांतरावर अवलंबून नाहीत तर ज्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत.