
फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या प्रवेश फेरीअखेर शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यभरातील १ लाख ५३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी १ लाख ३९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) अंतर्गत, तर १३ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतून प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून प्रक्रियेत अंतिम सहभाग नोंदवला आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, पुणे विभागात सर्वाधिक ३२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्याखालोखाल मुंबई विभागात २३ हजार ५८ आणि नागपूर विभागात २१ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय कोल्हापूर विभागात १८ हजार ४२३, नाशिक विभागात १८ हजार ८७४, अमरावती विभागात १५ हजार ६०८, छत्रपती संभाजीनगर विभागात १४ हजार ७८२ आणि लातूर विभागात ८ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
दरम्यान, पहिल्या फेरीत महाविद्यालयांचे वाटप होऊनही अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी ३ जून २०२६ पूर्वी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी याची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, अमरावती विभागात १३ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी कॅप प्रक्रियेतून आणि १ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला असून एकूण प्रवेशसंख्या १५ हजार ६०८ इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १४ हजार ७८२, कोल्हापूर विभागात १८ हजार ४२३, लातूर विभागात ८ हजार ५३६, मुंबई विभागात २३ हजार ५८, नागपूर विभागात २१ हजार ६८३, नाशिक विभागात १८ हजार ८७४ आणि पुणे विभागात सर्वाधिक ३२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. राज्यभरात कॅप प्रक्रियेतून १ लाख ३९ हजार ७१५ आणि विविध कोट्यांतून १३ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, एकूण प्रवेशसंख्या १ लाख ५३ हजार ७०८ इतकी झाली आहे.