
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया बुधवार (दि. ११) पासून सुरू होणार आहे. ही भरती प्रक्रिया शहरातील चिखली मार्गावरील नवीन पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राबविण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निःपक्षपाती आणि शासनाच्या नियमांनुसारच होणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी केले आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई पदाच्या ३२ जागा, बॅण्डस्मन पदाच्या ८ जागा तसेच चालक पोलिस शिपाई पदाच्या ८ जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बुधवारी सकाळी ४ वाजल्यापासून उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलिस शिपाई संवर्गासाठी एकूण ४,८०६ उमेदवारांनी अर्ज केले असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी ५,१२० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. सर्व पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी स्पष्ट केले की, उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेला अनिवार्यपणे उपस्थित राहावे. दिलेल्या वेळेत किंवा तारखेला अनुपस्थित राहणाऱ्या किंवा उशिरा हजर राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
भरती प्रक्रियेसाठी येताना उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच पाच पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे. भरतीच्या परिसरात भ्रमणध्वनी (मोबाईल) बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, मोबाईल वापरताना उमेदवार आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भरती प्रक्रियेत डमी उमेदवार आढळून आल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून राबविण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, शिफारस, नियमबाह्य हस्तक्षेप किंवा गैरप्रकाराला अजिबात वाव दिला जाणार नाही, असे पोलिस अधीक्षकांनी ठामपणे सांगितले. तसेच, “भरती करून देतो”, “नोकरी लावून देतो”, “माझी मोठी ओळख आहे” असे सांगून कोणी पैसे मागत असेल किंवा लाचखोरी करत असेल, तर अशा व्यक्तींपासून उमेदवारांनी सावध राहावे. अशा प्रलोभनांना बळी न पडता, संबंधित एजंट किंवा व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.