
सांगवी तालुका खंडाळा येथील फातिमा नसरुल्ला खान हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलीस दलात यशस्वी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे सांगवी-नायगाव परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. फातिमाचे मूळ गाव उत्तरप्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शिर्षिया हे आहे.फातिमाचे वडील नसरुल्ला खान हे गेल्या 25 वर्षांपासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या स्वप्नांसाठी मोठे कष्ट घेतले. त्यांच्या अथक परिश्रमांना आणि फातिमाच्या जिद्दीला अखेर यश मिळाले आहे.
नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी
फातिमाने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमी असलेल्या नायगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. दिवसभर घरच्या कामात आणि कुटुंबाला मदत करून ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.पोलीस भरतीसाठी तिला शिरवळ येथील चॅम्पियन करिअर अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीचे ज्ञानेश्वर माने, नवनाथ माने, प्रितम चोपडे आणि सुकन्या रासकर यांनी तिला विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर फातिमाने मुंबई पोलीस दलात निवड मिळवत यशाचा मानाचा तुरा रोवला.फातिमाच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.