सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आल्याने, नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या प्रोफाईलवर नजर टाकली असता त्यांचे थेट एनटीएशी कनेक्शन असल्याचे समोर येत असून, मुळात यंत्रणाच पोखरली गेली असल्याचे यातून समोर येत आहे.
केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांत पेपरफुटीच्या घटनांबाबत अपेक्षित ती कठोर भूमिका घेतली जात नाही. २०२४ मधील पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही ठीकाणी एनटीएमधील काही अधिकाऱ्यांना बढतीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांकडे गांभीर्याने बघितले जाणार आहे की नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) परीक्षा घेताना यूपीएससी स्तरावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि गोपनीयता पद्धतींचा अवलंब करते. मात्र, नव्या घटनांमुळे या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२४ साली झालेल्या अशाच प्रकारानंतर कारवाईचा फार्स झाला; मग कडक सुरक्षा असतानाही पेपर फुटतात याचाच अर्थ यंत्रणेतच काहीतरी गडबड आहे हे सांगण्यास कोण्या तज्ज्ञाची गरज नाही, असे बोलले जात आहे.
पेपरफुटी प्रकरणात समोर येणारी काही नावे ही केवळ प्यादे असू शकतात. प्रत्यक्षात या रॅकेटमागे मोठे जाळे कार्यरत असून, त्याला सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अशा प्रकारच्या घटना घडू शकत नाहीत. महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर नाशिक, राजस्थान, अहिल्यानगर यांसारख्या विविध ठिकाणी पेपरफुटीचे धागेदोरे आढळून येत आहेत. यात जो कोणी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. – डॉ. सुदर्शन घेरडे (अध्यक्ष, महाराष्ट्र युवा महासंघ)
विद्यार्थी अन् पालक बोलण्यास तयार नाहीत
यासंदर्भात नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थी तणावग्रस्त अवस्थेत दिसले. प्रतिक्रिया देण्यास अथवा बोलण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. विद्यार्थ्यांचे पालकही तणावग्रस्त मानसिकतेतून जात असल्याने त्यांनीही काहीही बोलण्यास नकार दर्शविला. असेच होत राहिले तर, आता आमच्या पाल्यांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होता.
विद्यार्थी एक-दोन वर्षे प्रामाणिकपणे मेहनत घेतात; मात्र त्या परिश्रमांचे योग्य फळ मिळेल याची खात्री त्यांना राहिलेली नाही. तिसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे अथवा गैरव्यवहारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, त्यांना मानसिक ताण आणि मनोबल खच्चीकरणाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, परीक्षा व्यवस्थेमध्ये अधिक कठोर आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. – मुकुंद किर्दत, प्रवक्ता (आम आदमी पार्टी)
विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य
एनटीए परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची अत्यंत कठोर तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कोणतीही संशयास्पद वस्तू नेता येत नाही. संपूर्ण तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही पेपर बाहेर कसा जातो, हा मोठा प्रश्न असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत असून, अनेक विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत.
पुण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालय-क्लासेस टायअप धोरण सर्रास राबविले जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा क्लासेसकडे ओढा वाढत असून, कनिष्ठ महाविद्यालये केवळ नावापुरती उरली आहेत. पेपरफुटी प्रकरणात काही महाविद्यालये व क्लासेसमधील हितसंबंधांची चौकशी करून टायअपचे जाळे तातडीने मोडीत काढावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. – कल्पेश यादव (अध्यक्ष, युवा सेना)
हे सुद्धा वाचा : NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन उघड! मनीषा वाघमारेसह आणखी एकाला CBIची अटक






