
जिल्ह्यातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक शिक्षक हे बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने त्यांना वर्षभर आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत सुट्टयांमध्ये जनगणना, मतदार नोंदणी (बीएलओ) आणि प्रशिक्षणाची कामे सोपविणे हा शिक्षकांवरील अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक समितीने सुचविले आहे की, नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित करण्यात यावे. जनगणना हे राष्ट्रीय काम असल्याने त्यात शिक्षक सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र मतदार नोंदणी व इतर प्रशासकीय कामांना मे महिन्यात स्थगिती देण्यात यावी. अन्यथा शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांच्या अध्यापन कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांचा मानसिक संतुलन व उत्साह महत्त्वाचा आहे. त्यामुळे या जनगणनेच्या कामासंदर्भात राज्य शासनाने शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रणजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत खंडोबा साळवे, दिलीप रासनी आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती विजय साळकर यांनी म्हटले आहे की, जनगणना सारख्या राष्ट्रीय कामात शिक्षक पूर्ण सहकार्य देतील मात्र, सुट्टयांमध्ये इतर प्रशासकीय कामांचा बोजा टाकणे योग्य नाही. शिक्षकांची मानसिकता चांगली राहणे आवश्यक आहे. शासनाने प्रशिक्षण व इतर कामांचे वेळापत्रक पुनर्विचार करून शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे.