
फोटो सौजन्य - Social Media
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच नागपूर येथे बारावीच्या पेपरफुटीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाचा पेपर परीक्षेच्या एक तास आधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
ही घटना सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर उघडकीस आली. एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालीमुळे पर्यवेक्षकांनी तपास केला असता तिच्याकडे स्मार्टफोन सापडला. फोन तपासल्यानंतर प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे आधीच शेअर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या ग्रुपमध्ये सुमारे १५ विद्यार्थी सहभागी असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत एका खासगी ट्यूशन शिक्षकाने पैसे घेऊन पेपर लीक केल्याचा आरोप समोर आला आहे. याआधी भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाचा पेपरही अशाच पद्धतीने व्हायरल झाल्याची चर्चा होती. त्यामुळे संपूर्ण परीक्षापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या घटनेची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील धायरी परिसरातही एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याचा प्रकार समोर आला. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा, या उद्देशाने हा प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. राज्यमंत्री भोयर यांनी नागपूरमधील श्री संताजी महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. खासगी कोचिंग क्लास, शिक्षक किंवा संबंधित कोणताही घटक दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील एका प्रकरणात २४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संभाजीनगर येथे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंडप टाकून परीक्षा घेण्यास परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कॉपीच्या व्हिडिओंची सत्यता तपासली जात असून तथ्य आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. शालेय शिक्षण व गृह विभाग या प्रकरणावर संयुक्तपणे लक्ष ठेवून असून, परीक्षांची पारदर्शकता राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असून, शिक्षण व्यवस्थेवर विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.