
फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी गाथा तसेच राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने खामगाव विश्व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानस्पर्धेसाठी शहरासह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी सुमारे २ हजार ते ४ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग नोंदवतात.
या ज्ञानस्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी व अभिमानास्पद इतिहास, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, राजमाता जिजाऊंचे संस्कार व विचार, राज्याभिषेक सोहळा, तसेच स्वराज्यासाठी केलेले त्याग व बलिदान यांची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ इतिहासाची ओळख करून देणे एवढाच उद्देश नसून, भावी पिढीने देव, देश व धर्मासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करावे, हा संदेश या ज्ञानस्पर्धेतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतो.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी ही ज्ञानस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७.०० ते ९.३० या वेळेत नॅशनल हायस्कूल, खामगाव येथील मैदानावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील वर्गशिक्षकांकडे १० रुपये परीक्षा शुल्क जमा करून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आयोजकांनी सांगितले.
या ज्ञानस्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन खामगाव विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी तसेच संयोजक नगरनाईक, सहसंयोजक चव्हाण व कुळकर्णी यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राजेंद्रसिंह राजपूत व अमोल जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.