फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ येथील एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.
शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शाळा हा आपल्या आयुष्यातील हळुवार कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यस्तरीय पुरस्कार – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गट – प्रथम- जिल्हा परिषद आदर्श पाथमिक शाळा धानोरे, जिल्हा, पुणे; द्वितीय नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55; तृतीय – जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर, जिल्हा- गडचिरोली.
उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम – प्रभात किड्स स्कूल अकोला जिल्हा अकोला, द्वितीय -कर्मवीर आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर, जिल्हा धुळे; तृतीय – कै. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द, जिल्हा जालना.
पुरस्काराचे स्वरुप
राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपये. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाख रुपये. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपये. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले गेले.