
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची मानली जाणारी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) समूहाची एमएचटी-सीईटी परीक्षा यंदा मोठ्या प्रमाणावर पार पडत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) आणि कृषी शिक्षणाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. २१ एप्रिलपासून सुरू झालेली ही परीक्षा २६ एप्रिल २०२६ पर्यंत सहा दिवस चालणार असून, दररोज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.
यंदा ही परीक्षा पूर्णपणे संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेतली जात असून, राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील १८९ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सीईटी कक्षाने विशेष नियोजन केले असून, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
या वर्षीचा सर्वात मोठा बदल म्हणजे विद्यार्थ्यांना दोन संधी देण्याचा निर्णय. याआधी ही परीक्षा एकदाच घेतली जात होती; मात्र विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी देण्यासाठी सीईटी कक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिली संधी २१ ते २६ एप्रिलदरम्यान होत असून, या संधीसाठी तब्बल २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दुसरी संधी १० आणि ११ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी १ लाख ११ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दोन्ही संधी मिळून एकूण ३ लाख ९५ हजार ८७२ विद्यार्थी पीसीबी समूहाची सीईटी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असल्यामुळे यंदाची परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक ठरणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित फार्मसी आणि कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळते.
तसेच, सीईटी कक्षाने यावर्षीपासून पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) समूह, पीसीबी समूह आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ही एक सकारात्मक पायरी मानली जात आहे.