महिला दिनाच्या निमित्ताने विवा महाविद्यालयात विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, महिला सक्षमीकरण कक्ष आणि यंग स्टार ट्रस्ट, आगाशी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रियांची शतपत्रे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. स्वाती कर्वे यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या महिलांच्या पत्रांचे संकलन करून ग्रंथ स्वरूपात प्रसिद्ध केले आहे. या ग्रंथातील निवडक पत्रांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या अभिवाचनाने झाली.
त्या काळातील स्त्री शिक्षणाची तळमळ आणि समाजप्रबोधनाचे प्रतिबिंब या पत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या अभिवाचनात दीपाली शहाणे, नेहा किणी, जान्हवी दरेकर, नमिता तेंडुलकर आणि सागर रानडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी पत्रांतील विचार, भावना आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती यांचा प्रभावी आविष्कार श्रोत्यांसमोर सादर केला.
या अभिवाचनातून 19 व्या आणि 20 व्या शतकात महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांचे विविध विषयांवरील विचार ऐकायला मिळाले. त्या काळातील समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने महिलांची रोखठोक भाषा, मुद्देसूद मांडणी आणि स्त्री-पुरुष समतेचा प्रगल्भ विचार यांचे दर्शन श्रोत्यांना या कार्यक्रमातून घडले. कार्यक्रमात वाचल्या गेलेल्या पत्रांमध्ये स्त्री शिक्षण, वर्णभेद, आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह, विधवा स्त्रियांचे पुनर्वसन, प्रापंचिक कामाचा मोबदला पत्नीला मिळावा अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. या पत्रांमधून महिलांच्या विचारसरणीचा प्रवास आणि शिक्षण हेच स्त्री सक्षमीकरणाचे मुख्य साधन आहे, हे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शक विलास पगारे यांची होती, तर निर्मिती प्रमुख देवेंद्र प्रभूदेसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सागर रानडे यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला वेगळेच वजन प्राप्त झाले. या समृद्ध अभिवाचनातून श्रोत्यांना प्रगल्भ आणि ऐतिहासिक दृष्टिकोन देणारा अनुभव मिळाला. कार्यक्रमासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्ष समिती प्रमुख डॉ. प्राक्तना कोरे यांचे मोलाचे सहाय्य लाभले. कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका हर्षवर्धिनी बोरणकर यांनी आभार प्रदर्शनाने केली. ‘स्त्रियांची शतपत्रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐतिहासिक महिला विचारांची उजळणी करता आली आणि महिलांच्या संघर्षमय प्रवासाला नवा दृष्टिकोन मिळाला.