
ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
ओतूर : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील गाडगे महाराज परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्याने प्रसंगावधान राखून वार हातावर झेलल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार रोजी दहावीचा इतिहास विषयाचा पेपर होता. ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचला होता. सर्व विद्यार्थी आपापल्या बाकावर बसून परीक्षेची तयारी करत असतानाच, अचानक एक १७ वर्षीय अनोळखी मुलगा वर्गात शिरला. कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने आपल्या दप्तरातून धारदार कोयता बाहेर काढला आणि संबंधित विद्यार्थ्याच्या दिशेने जोराने वार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. मात्र, ज्याच्यावर हल्ला झाला त्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने जराही न डगमगता कमालीचे धैर्य दाखवले. समोरून येणारा वार थेट शरीरावर होऊ नये यासाठी त्याने आपला हात मध्ये घातला. कोयत्याचा वार हातावर बसल्याने तो जखमी झाला, मात्र या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. वर्गातील इतर विद्यार्थी आणि पर्यवेक्षक या प्रकाराने भयभीत झाले होते.
वर्गात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होताच केंद्र प्रमुख संपत माने आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वर्गाच्या दिशेने धाव घेतली. “आम्ही आमचे कामकाज पाहत असताना अचानक जोरात आवाज झाला. आम्ही तातडीने तिथे पोहोचून जखमी विद्यार्थ्याची सुटका केली आणि हल्ला करणाऱ्या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले,” अशी माहिती केंद्र प्रमुख माने यांनी दिली.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेमुळे तो मानसिक धक्क्यात असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. केंद्र प्रमुखांनी त्याला धीर दिला आणि नियमानुसार त्याला ‘रायटर’ (लेखनिक) उपलब्ध करून देण्यात आला. या मदतीच्या जोरावर त्याने आपला इतिहासाचा पेपर पूर्ण केला. त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परीक्षा केंद्रासारख्या सुरक्षित ठिकाणी कोयता घेऊन एखादा मुलगा वर्गात शिरतोच कसा? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळा आणि परीक्षा केंद्रांच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी केली आहे. सध्या ओतूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
हे सुद्धा वाचा : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर