कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात; कार शंभर फूट खाली कोसळली अन्...
कोल्हापूर : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. आतापर्यंत अपघातांमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता कोल्हापुरातून एक मोठी घटना समोर आली आहे. सातेरी डोंगरातील सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट खाली कार कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे.
या अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय २८ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, सातेरी देवीचे दर्शन घेऊन खाली परत येत असतानाच वाघोबावाडीला जाणाऱ्या घाटात शंभर फूट खाली शेतामध्ये पवार दाम्पत्याची इको कार (MH.09.GU.५६३५) कोसळली. इको कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. दरम्यान या अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्सने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान बहिण दाजींचा कोणताही पत्ता लागत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय ३४ रा. २४३, शनिवार पेठ, पाठण कॉलनी, कराड, ता. कराड जि. सातारा) यांनी काल (७ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोघेही न सांगता निघून गेल्याने आणि त्यांच्याकडे कोणताही संपर्क होत नसल्याने अतुल शिंदे यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र, तक्रार दाखल करून काही तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांचाच अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुदैवाने हे दाम्पत्य जखमी झाले असून, उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, या घटनेमागे काही घातपात आहे का? की यांचा अपघातच झाला होता, या संदर्भात पुढील तपास पोलिस करत आहेत.