कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
कागल : सततचा मानसिक त्रास, गावात होणारी बदनामी आणि लग्नात होणारा अडथळा या त्रासास कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रांती श्रीकांत कांबळे (वय २४) (केनवडे, ता. कागल) असे मृत तरुणीचे नाव आहे, ही घटना ५ ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल बाजीराव पाटील (वय ३२) (रा. केनवडे ता कागल) याला कागल पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केनवडे गावातीलच संशयित अमोल पाटील हा सन २०२३ ते २०२५ या काळात पूर्वीचे प्रेम संबंध असल्याचे सांगून मृत शुक्रांतीचा पाठलाग करत असे. सतत घराभोवती आणि घरासमोरून फेऱ्या मारणे, शिट्ट्या मारणे, हातवारे करून फोन करण्याचा इशारा करणे, ठरत असणाऱ्या लग्नाची स्थळे मोडणे, याबाबत नातेवाईकांच्या मध्ये बदनामी करून मानसिक त्रास देणे. या सर्व त्रासाला शुक्रांती कंटाळलेली होती. त्यामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने सतत होणाऱ्या मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर शुक्रांतीने पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातच विषारी तणनाशक प्राशन केले.
तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तथापि उपचार सुरू असतानाच १० ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीकांत कांबळे यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अमोल पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास डीवायएसपी सुजित क्षीरसागर करीत आहेत.