
अपघाताचा बनाव रचून साडे 6 लाखांचे खोबरे लंपास; दौंड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
दौंड : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. खोबऱ्याच्या मालाच्या अपहार प्रकरणाचा दौंड पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीचे ३६१५ किलो खोबरे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२६ रोजी फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा (रा. चिंकमंगळूर, कर्नाटक) यांनी त्यांचा आयशर टेम्पो (एमएच ४७ एएस ५३६८) मधून ३६१५ किलो खोबरे चिंकमंगळूर येथील ट्रेडिंग कंपनीमधून पुण्यातील गुलटेकडी येथे विक्रीसाठी पाठविले होते. हे वाहन चालक मनोज आंध्रेश बनसोडे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान, दिनांक १९ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चालक मनोज बनसोडे याने फिर्यादीला फोन करून कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत सोलापूर–पुणे महामार्गावरील हॉटेलसमोर वाहनाचा अपघात होऊन टेम्पो पलटी झाल्याचे तसेच त्यातील खोबरे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक चौकशीत प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान चालक मनोज बनसोडे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार आणि तुषार लक्ष्मण जगताप (सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या संगनमताने टेम्पोतील खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा प्रकार लपविण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही निष्पन्न झाले.
हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…
याप्रकरणी फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने व महादेव जाधव यांनी ही कारवाई केली.