
Increase in extortion cases in the name of Lawrence Bishnoi, police focus on local gangsters
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात खंडणीच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये १९९ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२५ मध्ये ही संख्या ३१४ वर पोहोचली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरात बिल्डर्स आणि मोठ्या व्यावसायिकांपासून ते अगदी रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच “हफ्ता” वसुलीसाठी टार्गेट केले जात आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून खंडणी मागितल्याचे अनेक आरोप होत असले तरी, मुंबई पोलिसांनी यावर महत्त्वाची स्पष्टीकरणे दिली आहेत. शहरात नोंदवण्यात आलेल्या बहुतांश घटनांमध्ये स्थानिक गुंड सक्रिय असून, ते केवळ दहशत निर्माण करण्यासाठी मोठ्या गँगस्टर्सच्या नावाचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणीच्या वाढत्या आकडेवारीमागे ‘सेक्सटॉर्शन’ (Sextortion) हे एक मोठे कारण आहे. ऑनलाइन माध्यमांतून फसवणूक करून खंडणी उकळण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. (Mumbai Crime news)
बॉलिवूड चित्रपटसृष्टी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी यांच्यातील संघर्ष फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून, यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या तपासात आता एक वेगळाच आणि धक्कादायक खुलासा समोर येत आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत बिल्डर्सपासून ते फेरीवाल्यांपर्यंत खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात झालेल्या तपासाअंती पोलिसांचे लक्ष आता बिश्नोई टोळीऐवजी स्थानिक गुंड आणि बेरोजगार तरुणांकडे वळले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा प्रचंड प्रभाव आणि दहशत वापरून काही स्थानिक टोळ्या खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. तातडीने पैसे मिळवण्यासाठी काही बेरोजगार तरुण बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचे भासवून व्यावसायिकांना धमकावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘२०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतरही हा ट्रेंड कायम राहिला. काही लोक टोळीच्या प्रभावाखाली सोशल मीडियाचा वापर करतात, तर काहीजण ते पैसे कमविण्याची संधी म्हणून पाहतात. गेल्या वर्षी खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली, तरी यामध्ये मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग नसल्याचे समोर आले आहे. ही वाढ प्रामुख्याने ‘सेक्सटॉर्शन’ आणि स्थानिक गुंडांकडून बिल्डर्स व कंत्राटदारांकडे मागितल्या जाणाऱ्या ‘हफ्त्या’मुळे झाली आहे. विशेष म्हणजे, प्रस्थापित टोळ्यांकडून थेट येणाऱ्या खंडणी कॉल्सच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.
विलेपार्ले येथील प्रसिद्ध ज्वेलर्स अजित जैन यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकावून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करण्यात आली आहे. इम्तियाज आलम अन्सारी (३०) असे या आरोपीचे नाव असून, तो झारखंडमधील धनबादचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा शाळा सोडलेला (School Dropout) तरुण आहे.
आरोपी अन्सारी याने जैन यांना धमकावण्यासाठी चक्क ब्रिटनचे (UK) सिम कार्ड वापरून व्हॉट्सॲप मेसेज आणि किमान सहा कॉल केले होते. “आम्हाला तुमच्याकडून २० लाख रुपये रोख हवे आहेत. तुम्हाला गोळी हवी आहे की उत्तर?” असा धमकीचा मेसेज त्याने पाठवला होता. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चार जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर या मास्टरमाइंडचा शोध लागला.