बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह सापडला (फोटो सौजन्य सोशल मिडीया)
हेही वाचा:Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!
कविता मिस्त्री ८ सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे महिलेचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष कविता आणि नरेश सोनवणे यांच्या संबंधांकडे गेले. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कविता बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये वाद झाल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ८ सप्टेंबर रोजी नरेशने कविताला दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर दोघे दुचाकीवरून निघाले. याचदरम्यान कविताने मैत्रिणींशी व्हिडिओ कॉल करून आपण नरेशसोबत जात असल्याचे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी कविता आणि नरेश यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यामध्ये दोन्ही मोबाईलचे शेवटचे लोकेशन म्हसावद परिसरात आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही मोबाईल बंद झाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी पद्मालय परिसरातील जंगलात कविता यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या स्थितीवरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर आधी दाखल असलेल्या अपहरणाच्या प्रकरणाचा तपास खुनाच्या दिशेने वळवण्यात आला.
तांत्रिक माहिती आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे नरेश ऊर्फ आबा सोनवणे याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेण्यात आले. जुन्या संबंधातील वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची माहिती दिली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण, घटनेच्या वेळी काय घडले आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. संशयिताविरोधात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनीसह जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.






