trimbkeshvar (फोटो सौजन्य : social media )
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परवानगीशिवाय प्रसादाच्या लाडूंची विक्री सुरू झाल्याने आता हा प्रकार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या या लाडू विक्रीप्रकरणी भारतीय पुरातत्व खात्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र लिहून विश्वस्त मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
कल्याणमध्ये ॲम्बुलन्ससाठी 1000 रुपये नसल्याने महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले अनाथ
गुढी पाडव्यापासून त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळाकडून भाविकांनी बुंदीच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप सुरु करण्यात आले होते. मंदिराच्या आवारात परवानगी न घेता विश्वस्त मंडळाकडून प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या लाडू विक्री विरोधात माजी विश्वस्तांनी देखील भारतीय पुरातत्व खात्याकडे तक्रार दाखल केली होती. ह्या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं की, “प्रसाद” या नावाखाली व्यापारी स्वरूपात पैसे घेऊन लाडू विकले जात होते, जे पुरातत्व कायद्यानुसार संरक्षित स्मारक परिसरात अनधिकृत आहे.
मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्या प्रकरणी पुरातत्त्व खात्याकडून पोलिसांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे संरक्षित स्मारक असतानाही, तेथे अनधिकृतपणे व्यावसायिक लाडू विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप विश्वस्त मंडळावर करण्यात आला आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, असे भारतीय पुरातत्व खात्याने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर त्र्यंबकेश्वर पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराला ‘अ वर्ग’ दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत ‘अ वर्ग’ दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. त्यामुळे येथे सुव्यवस्थेसाठी तंतोतंत नियम आणि कायद्यांचं पालन गरजेचं मानलं जातं. मंदिर परिसरातील कोणतीही व्यावसायिक कृती ही फक्त परवानगी आणि कायद्याच्या चौकटीतच होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई