
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल **कौस्तुभ सांगळे** यांनी मुंबईतील महाराष्ट्र लोक भवन येथे कर्तव्यावर असताना स्वतःच्या सर्व्हिस एसएलआर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. कौस्तुभ हे 2024 च्या तुकडीतील जवान होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 जून रोजी त्यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची पोस्टिंग राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या उच्च-सुरक्षा ‘महाराष्ट्र लोक भवन’ येथे करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत त्यांची ‘टॉवर-2’ येथे ड्युटी होती. कर्तव्यावर असताना ते एका बंदिस्त भागात गेले आणि तेथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. 7.62 मिमी एसएलआर रायफलची गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एसआरपीएफमध्ये प्रत्येक तीन तासांनी सुरक्षा पथकाची अदलाबदल केली जाते. रात्री सुमारे 9 वाजता पुढील शिफ्टचे जवान ड्युटी स्वीकारण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मलबार हिल पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि एसआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून तिची तपासणी सुरू आहे.
प्रेमसंबंधांच्या अँगलनेही तपास
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान कौस्तुभ यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती, मात्र नंतर हे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचे लग्न दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी निश्चित झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपास यंत्रणा या घडामोडींचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचीही पडताळणी करत आहेत.
कथित खासगी फोटो आणि आत्महत्येच्या धमक्यांचाही तपास
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिला कॉन्स्टेबलचे लग्न ठरल्यानंतर कौस्तुभ यांनी तिच्यासोबतचे काही कथित खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तसेच त्यांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलला वारंवार फोन करून आत्महत्येच्या धमक्या दिल्याचाही तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महिला कॉन्स्टेबलने यापूर्वीच भाईंदर पोलिसांना परिस्थितीची माहिती दिली होती का, त्यानंतर कोणती कारवाई झाली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती का, तसेच कथित फोटो पाठवण्यामागील उद्देश काय होता, यासह अनेक मुद्द्यांची पोलीस चौकशी करत आहेत.
कौटुंबिक परिस्थितीचाही तपास
तपासादरम्यान कौस्तुभ यांच्या कौटुंबिक परिस्थितीबाबतही काही बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यांना दोन बहिणी असून त्यापैकी एका बहिणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, तर दुसरी विवाहित आहे. कौस्तुभ यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा, वैयक्तिक आयुष्याचा आणि अलीकडील घडामोडींचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
मानसिक आरोग्य तपासणीचीही पडताळणी
या प्रकरणात एसआरपीएफच्या अंतर्गत कार्यपद्धतीचीही चौकशी सुरू आहे. जवानांची नियमित मानसिक आरोग्य तपासणी झाली होती का, त्यांना समुपदेशनाची गरज भासली होती का आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मानसिक स्थितीची माहिती होती का, याचीही पडताळणी केली जात आहे. मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप आत्महत्येचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील माहिती समोर येणार असल्याचे सांगितले आहे.
रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
Ans: घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली असून तिची तपासणी सुरू आहे.
Ans: प्रेमसंबंध, वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक परिस्थिती, मानसिक तणाव आणि सुसाईड नोट या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.
Ans: कौस्तुभ सांगळे हे कोल्हापूर येथील एसआरपीएफ गट-16 मधील कॉन्स्टेबल असून त्यांची नुकतीच मुंबईतील महाराष्ट्र राजभवनात नियुक्ती झाली होती.