
एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : गाढेपिंपळगाव येथून चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या तपासातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या तीन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. सलग कारवायांत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३३ चोरीच्या दुचाकी आणि सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अनेक वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक घासून पुरावे नष्ट करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला होता. मात्र तांत्रिक तपास, सीसीटीएनएस प्रणाली, आरटीओ अभिलेख आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची ओळख पटवत विविध पोलिस ठाण्यांतील ३३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरी विरोधात विशेष मोहीम राबविली. विरगाव, चिकलठाणा आणि एमआयडीसी पैठण पोलिसांनी स्वतंत्र तपास करत वाहनचोरांच्या तीन टोळ्यांपर्यंत मजल मारली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पटवली वाहनांची खरी ओळख
विरगाव पोलिसांनी सर्वाधिक १९, चिकलठाणा पोलिसांनी ८, तर एमआयडीसी पैठण पोलिसांनी ६ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त वाहनांमध्ये महागड्या दुचाकींचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरीच्या वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक घासल्याचे समोर आले. मात्र वाहनांची वैशिष्ट्ये, उपलब्ध क्रमांकांचे अवशेष, आरटीओ नोंदी सीसीटीएनएस प्रणाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाहनांची खरी ओळख पटवली.
या तपासातून विरगाव, वैजापूर, सिल्लोड, चिकलठाणा, शिवूर, पैठण, देवगाव रंगारी, छावणी, सातारा, सिटी चौक, सिडको, वेदांतनगर तसेच श्रीरामपूर परिसरातील वाहनचोरीचे ३३ गुन्हे उघडकीस आले. वाहनांची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी अनेक दुचाकींचे चेसिस आणि इंजिन क्रमांक घासून टाकले होते. मात्र तांत्रिक तपास, सीसीटीएनएस प्रणाली, आरटीओ अभिलेख तसेच वाहनांचे मॉडेल, रंग व इतर वैशिष्ट्यांच्या आधारे पोलिसांनी प्रत्येक वाहनाची अचूक ओळख पटवली. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाले.
तीन कारवायांत मोठे यश
विरगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक करून १९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. चिकलठाणा पोलिसांनी तीन आरोपींकडून ८ दुचाकी हस्तगत केल्या, तर एमआयडीसी पैठण पोलिसांनी सात आरोपींना अटक करून ६ दुचाकी जप्त केल्या. तिन्ही कारवायांत एकूण ११ आरोपी जेरबंद झाले असून, १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वाहनचोरी हा केवळ चोरीचा गुन्हा नसून त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करण्यावर ग्रामीण पोलिसांचा भर आहे. प्रत्येक प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहनचोरीविरोधातील मोहीम पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहील. – प्रकाश जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक, ग्रामीण.