
ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात 'दुधानी टोळी' जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले
ओतूर : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘दुधानी टोळी’चा (शिकलकरी गँग) ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी (१२ जुलै) जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्टल (गावठी कट्टा), कटावणी, कटर, पान्हे आणि चोरीची बोलेरो गाडी यांसह गुन्ह्यासाठी लागणारे विविध घातक साहित्य जप्त केले आहे.
या टोळीवर एकट्या तेलंगणा राज्यात तब्बल २५ गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये सोनुसिंग पापसिंग दुधानी (वय ३५, रा. हडपसर, पुणे), जिलूसिंग शेरसिंग दुधानी (वय ३८, रा. खोपोली, जि. रायगड), पंकजसिंग धारूसिंग शिकलकर (वय ४०, रा. आंबरनाथ), करणसिंग गगणसिंग टाक (वय २७, रा. जि. परभणी), मंगलसिंग मायासिंग दुधाने (वय ६०, रा. झरी, जि. परभणी), कृष्णासिंग साहेबसिंग टाक (वय १८, रा. झरी, जि. परभणी) या गुंडाचा समावेश आहे.
चोरीच्या गाडीमुळे फुटले बंड; असा घडला थरार
राहुरी (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीची महिंद्रा बोलेरो गाडी (क्रमांक: एमएच-१७ एजे-३०७५) काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील विघ्नेश घोलप हे नगर-कल्याण महामार्गावरून जात असताना, त्यांना येथील एका वडापाव हॉटेलसमोर आपल्या नातेवाईकांची चोरी झालेली बोलेरो गाडी उभी असलेली दिसली. संशय बळावल्याने घोलप यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी थेट गाडीची चावी काढून घेतली आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी सुरू केली. यावर गांगरलेल्या आरोपींनी घोलप यांच्याशी झटापट करत स्थानिक नागरिकांवर दगडफेक सुरू केली. तसेच जवळ असलेल्या हत्यारांचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी शेतात पाठलाग करून आरोपींना पकडले
आरोपी पळत असताना ग्रामस्थांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांचा थरारक पाठलाग केला. सुरुवातीला ४ जणांना नागरिकांनी जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर उर्वरित २ आरोपींनी कट्ट्याचा धाक दाखवून आलमे गावच्या दिशेने पळ काढला. मात्र, घटना कळताच परिसरातील शेकडो ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी शेतातून आणि झाडीझुडपातून थरारक पाठलाग करून पळून गेलेल्या इतर आरोपींनाही हुडकून काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले सर्व आरोपी अत्यंत सराईत आणि हिंसक प्रवृत्तीचे आहेत. कोळवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे आणि धाडसामुळे या टोळीला पकडता आले असून, परिसरात होणारा एक मोठा अनर्थ टळला आहे.
पोलीस पथकाची धडक कारवाई
या मोठ्या कारवाईची माहिती मिळताच जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, योगेश उकर्डे, ज्योतीराम पवार, मनोज राठोड, दिनेश साबळे, सुभाष केदारी, रोहित बोबले आणि विशाल गोडसे यांच्या पथकाने पुढील कायदेशीर कारवाई व शोधमोहीम यशस्वीरीत्या केली. या टोळीकडून महाराष्ट्रातील अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, कोळवाडी ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.