
घरफोडीमधील मुद्देमाल 'गायब' की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील घरफोडीच्या गुन्ह्यात शहापूर पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती. चौकशीत संशयितांकडून इचलकरंजी, जयसिंगपूरसह विविध ठिकाणांवरील तब्बल ९ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईदरम्यान सुमारे ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत केल्याचे पोलिसांनी दाखवले होते.
मुद्देमालबाबत स्पष्टता नसल्याने संशय
दरम्यान, एका स्वतंत्र घरफोडीच्या तपासासाठी शहापूर पोलिसांनी एका संशयिताला वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. वडगाव पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता, चोरीतील सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल आधीच शहापूर पोलिसांकडे जमा केल्याचे संशयितांनी सांगितले. मात्र, या मुद्देमालाची प्रत्यक्ष शहानिशा करताना कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध मुद्देमालात मोठी तफावत असल्याचे समोर आले. यावरून शहापूर व वडगाव पोलिसांमध्ये तीव्र वाद झाला. मुद्देमाल नेमका किती, कुठे आणि कोणाच्या ताब्यात आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने संशयाची सुई थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे वळली आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत चौकशीचे आदेश दिले.
अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चौकशीची धुरा हाती घेत इचलकरंजी, सांगली आणि जयसिंगपूर परिसरातील आठ सराफ व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावले आहे. चोरीतील सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीबाबत तसेच पोलिसांकडे जमा करण्यात आलेल्या मुद्देमालासंदर्भात त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा : ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…
सोने कुठे गेले? पोलिसांच्याच नोंदी संशयास्पद
घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये व गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनात गंभीर तफावत आढळल्याने शहापूर व वडगाव पोलिस ठाण्यांमध्ये खळबळजनक वाद उफाळला. संशयितांनी मुद्देमाल शहापूर पोलिसांकडे दिल्याचा दावा केल्यानंतर प्रत्यक्ष मुद्देमाल ‘गायब’ असल्याचे संकेत मिळाल्याने प्रकरण थेट वरिष्ठ पातळीवर गेले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी सुरू असून, दोष कुणाचा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोने प्रकरणात काहीच तथ्य आढळून आले नाही. मात्र चारचाकी वाहन प्रकरणात शहापूर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळल्याचे आढळून आले आहे. तसा अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे सादर करण्यात आला आहे. – अप्पर पोलीस, अधिक्षक आण्णासाहेब जाधव