
पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!
पाटस : सिमेंट वाहतूक करणारी वाहने भरण्याच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील तब्बल १८ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी १० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी ( दि. ५ जून ) रोजी पाटस येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्स समोर दुपारी तुफान राडा झाला. श्री सिमेंट कंपनीत ट्रक भरण्याच्या कारणावरून “कडू गट” आणि “कु-हाडकर गट” आमने-सामने आले. वाद विकोपाला जाऊन लोखंडी गज आणि दगडांनी डोक्यात मारहाण झाली. यानंतर गावठी पिस्तूलमधून ३ राऊंड हवेत फायर करण्यात आले होते.
घटनेनंतर यवत पोलीस, पाटस पोलीस आणि ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त मोहीम राबवली. आरोपींना उसाच्या शेतातून आणि इतर भागातून शोधून १० जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटांकडून परस्पर तक्रार दाखल झाल्याने एकूण १८ जणांवर यवत पोलीस ठाण्यात BNS कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कडू गटाचे संतोष बाळकृष्ण कडू ( रा. बेटवाडी ता. दौंड जि. पुणे ), आण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर आण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व इतर 4 ते 5 अनोळखी. तर कु-हाडकर गटाचे सूरज राजेंद्र कु-हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण (सर्व रा. अंबिकानगर पाटस ता.दौंड जि.पुणे ) व इतर 3 ते 4 अनोळखी आहेत.
सूरज कु-हाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाद मिटवण्यासाठी चर्चेसाठी बसले असताना बेकायदेशीर जमा जमवून लोखंडी गदाने व दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी करून शिवीगाळ, दमदाटी केली तर भांडणे मिटवण्यासाठी चर्चेसाठी बोलावून घेऊन शिवीगाळ दमटाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अजय धोत्रे याने गावठी कट्टयाने संतोष कडूच्या दिशेने गोळीबार केला. अशी फिर्याद संतोष कडू यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, या घटनेने नवीन वळण घेतले आहे. लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्समध्येच पाटसच्या एका माजी सरपंचांचे सिमेंट कंपनीच्या वाहनांचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. आरोपी याच कार्यालयात आले होते का? वादाची ठिणगी इथूनच पडली का? सिमेंट कंपनीचा ट्रान्सपोर्ट करणारा ठेकेदारच या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार आहे का? श्रीगोंदा तालुक्यातील गुंडप्रवृत्तीची टोळी कोणी बोलावली होती? असे अनेक प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आणखी आरोपी आहेत का याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पाटस ग्रामस्थांनी पोलिसांकडे निपक्षपाती आणि पारदर्शक तपास करून खरे मुखवटे उघड करावेत अशी मागणी केली आहे.
गोळीबारानंतर पाटसमध्ये निर्माण झालेला तणाव आता पोलिसांच्या कारवाईने काहीसा कमी झाला आहे. मात्र ट्रान्सपोर्ट, सिमेंट लॉबी आणि गुन्हेगारी यांचा संबंध समोर आल्याने गावात चर्चेचा विषय बनला आहे. ह्या प्रकरणाच्या मुळाशी असलेले ट्रान्सपोर्ट आणि कॉन्टॅक्टर चे राजकारण उघडे होणे गरजेचे आहे. सध्या सिमेंट कंपनीतील वाढती गुन्हेगारी पाटसकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.