समीर भुजबळ यांच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. अनेक नेते विधानसभेसाठी इच्छुक असले तरी निवडक नेत्यांना संधी मिळाली आहे. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जागावाटपामध्ये अनेकांच्या संधी गेल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर देखील वाढली आहे. नाशिकमध्ये भुजबळ घरामध्ये बंडखोरी झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते अपक्ष लढणार आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षातून राजीनामा दिला असून 28 तारखेला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देऊन मत व्यक्त केले आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या, राजकारणातील सगळेच पुतणे यांचे डीएनए सारखाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यावर टीका करताना अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “भुजबळ कुटुंबीयांना अनेक अडचणीतून जावे लागत आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना विचार करावाच लागतो. किती दिवस ते मला विचारतील, इकडे जाऊ का? तिकडे जाऊ का? ते आता मोठे झालेत, त्यांचे निर्णय त्यांना घेवू द्या आणि त्यांनाही आता राजकारण कळतं ना, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याबाबत त्यांचाही अभ्यास झाला आहे,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : ‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका
समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्षभरापूर्वी आपल्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केली होती. जबाबदारी पार पडत असताना प्रतिकूल परिस्थितीत संघटन मजबुतीने उभे केले. मात्र भुजबळ कुटुंबीयांचे ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय खूपच बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण दूषित बनलं आहे. नांदगावमधील नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबत कैफियत मांडली होती. नागरिकांची मागणी आणि दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे,” असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे.