महायुतीच्या सरकारच्या योजनांविषयी विरोधकांकडून अपप्रचार…; दिलीप वळसे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे जोरदार प्रचार करत आहेत. मतदारसंघामध्ये त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून महायुतीच्या योजनांची माहिती दिली आहे.
मंचर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते जोरदार प्रचार करत आहेत. दिलीप वळसे पाटील हे देखील शिरुर आंबेगाव मतदारसंघामध्ये त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधून विरोधकांवर टीका केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 23 नोव्हेंबर नंतर महायुती सरकार पुढे सुरु ठेवणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दिलीप वळसे पाटील हे मागील सात टर्म आमदार राहिले आहेत. त्यांना आठव्यांदा आमदार करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुती राज्य सरकारच्या योजनांची माहिती मतदारांना देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “राज्यातील महायुतीच्या सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत . महिलांसाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी वीज बील माफी योजनांचा फायदा सध्या होत आहे. या योजनांची खिल्ली उडवून विरोधक योजना बंद पडणार असल्याचा अपप्रचार करत आहेत . या पुढील काळातही या योजना सुरुच राहणार आहेत, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे यांनी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात चिंचोली (कोकण्यांची) परिसरातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या कोपरासभेत ते बोलत होते. यावेळी दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले ” तालुक्यात गावां – गावांमध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने आर्थिक सुबत्ता आली आहे. या गावांनी मला खंबीरपणे पाठिंबा देण्याचे काम केले . आपण देखील राज्यात काम करत असताना मंत्रीपदे सांभाळली. मंत्रीपदांचा आपल्या मतदारसंघाला अधिकचा फायदा मी मिळवून दिला. घोडेगाव – गोनवडी येथील आयटीआय, इंग्रजी माध्यमाची शाळा आपण उभारल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तेथे उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे.
पुढे वळसे पाटील पुढे म्हणाले “या तालुक्यात विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे आपण केली . राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे . महायुती सरकारने महिला, मुली, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. निवडणुकीनंतर देखील या योजना सुरूच राहणार आहेत. विरोधकांकडून या योजनांविषयी अपप्रचार सुरु आहे. मात्र त्यांच्या भूलथापांना बळी न पडता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.