
Modi government collapse after Maharashtra assembly elections results
राजुरा : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुढील तीन दिवसांत प्रचारतोफाही थंडावणार आहेत. त्यापूर्वीच आता नेतेमंडळींच्या सभा होत आहेत. त्यात आता ‘मागील दहा वर्षांपासून केंद्रात व राज्यात असलेल्या सरकारने सर्वसामान्य जनतेला न परवडणारी महागाई वाढवली. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. अशा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या विरोधात धोरण राबवून व भाववाढ करून येथील जनतेला मोदी सरकारने लुटले आहे’, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केला.
हेदेखील वाचा : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; हल्ल्यानंतर इस्त्रायलने दिला ‘हा’ इशारा
राजुरा येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात काँग्रेस व महायुतीचे उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रेड्डी बोलत होते. सुभाष धोटे यांनी आपल्या कारकिर्दीत आपण अनेक विकासकामे पूर्ण केली असून, आगामी काळात क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या सभेला काँग्रेस उमेदवार आ. सुभाष धोटे, काँग्रेस एआयसीसी सचिव डॉ. संपत कुमार, निरीक्षक अनुप फिलिप, खा. किरण रेड्डी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा
पुढे बोलताना रेडडी म्हणाले की, भाजपची सत्ता महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्रण लावले. भाजपने शेतकऱ्यांना काहीही मदत दिली नाही. उलट सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामार्फत मोदींनी कमजोर करून महाराष्ट्राला लुटून आपल्या उद्योगपती मित्रांना मोठे केले. आता हा प्रकार थांबवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही रेड्डी यांनी केले.
अनेक नेतेमंडळी महाराष्ट्रात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रीय पक्षांचे दिल्लीचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच प्रियांका गांधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली.
प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात : राहुल गांधी
“विधानसभा निवडणुकीची ही लढाई विचारधारेची आहे, एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. आपला देश संविधानाने चालला पाहिजे. मात्र, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला केवळ हे एक पुस्तक आहे असे म्हणतात. पण संविधान हे देशाचा डीएनए आहे. यामध्ये सर्व महापुरुषांचे विचार आणि इतिहासकालीन विचार आहे. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावती येथील सभेत केली होती.
हेदेखील वाचा : अमेरिकेत सरकारी नोकरशाहीत मोठ्या प्रमाणात कपात; देशाच्या विकासासाठी करणार मस्कच्या पद्धतीचा अवलंब