
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिकेत आले असून, त्यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात थेट जाऊन जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची सुरुवात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून झाली. खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात झालेल्या जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका करत त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा जुना व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये देशमुख यांनी ‘आईंची शपथ घेऊन शिवसेनेसोबतच राहणार’ असे म्हटले होते. याच मुद्द्यावरून ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत, ‘आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल?’ असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सभेला भावनिक आणि राजकीय दोन्ही स्वरूप प्राप्त झाले.
पक्षसंघटना नव्याने उभारण्याचे प्रयत्न
या दौऱ्याकडे केवळ राजकीय सभा म्हणून न पाहता पक्षसंघटना पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेही या दौऱ्यात सहभागी असून, काल रात्री ते नागपूरला दाखल झाले होते. त्यानंतर शनिवारी यवतमाळ येथे पहिली सभा पार पडली. राजकीय निरीक्षकांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली ही रणनीती नवी नाही.
शरद पवारांच्या ‘पावलावर पाऊल’
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनीही बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीरसभा घेत जनतेची माफी मागितली होती. येवला येथे छगन भुजबळ आणि परळीत धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील सभा त्याची उदाहरणे ठरली होती.
बंडखोरांच्या मतदारसंघात बाजू मांडण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातून जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात अशाच सभांद्वारे ते फुटीर आमदार आणि खासदारांविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.
ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात