
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘3 इडियट्स’चा सीक्वल तयार करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचं राजकुमार हिरानी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, चित्रपटाबाबत आत्ताच फारसे तपशील समोर आणण्याची त्यांची इच्छा नाही. एएनआयशी बोलताना हिरानी यांनी सांगितलं की, टीम या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि योग्य टप्प्यावर पोहोचल्यानंतरच त्याबाबत अधिकृतपणे चर्चा केली जाईल.
विशेष म्हणजे, सीक्वलसाठी मूळ कलाकारच कायम राहणार असल्याचं हिरानी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा अनुक्रमे रँचो, फरहान आणि राजूच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता निश्चित झाली आहे.
सीक्वलबाबत उत्सुकता असली तरी राजकुमार हिरानी घाई करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सध्या चित्रपटाचं काम लेखनाच्या टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हिरानी यांच्या मते, ‘3 इडियट्स’ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. त्यामुळे त्याच दर्जाची कथा तयार झाली तरच सीक्वल पुढे नेला जाईल. स्क्रिप्ट परिपूर्ण झाल्याशिवाय चित्रपट बनवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे केवळ पहिल्या भागाच्या यशाचा फायदा घेण्यासाठी सीक्वल बनवण्याऐवजी, प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय देणारी कथा तयार करण्यावर निर्मात्यांचा भर असल्याचं दिसत आहे.
राजकुमार हिरानी यांनी ‘कलाकार तेच राहतील’ असं स्पष्ट केल्यामुळे आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, सीक्वलमध्ये इतर कोणते कलाकार असतील किंवा जुन्या पात्रांची कथा नेमकी कुठून पुढे सुरू होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पहिल्या भागात करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे सीक्वलमध्ये या कलाकारांपैकी कोण पुन्हा दिसणार, याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
२००९ मध्ये प्रदर्शित झाला होता ‘3 इडियट्स’
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ २००९ साली प्रदर्शित झाला होता. चेतन भगत यांच्या ‘Five Point Someone’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात शिक्षणव्यवस्था, मैत्री, करिअर आणि विद्यार्थ्यांवरील अपेक्षांचा वेध घेण्यात आला होता.
आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या अभिनयासोबतच करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय ठरल्या.
बॉक्स ऑफिसवरही केला होता विक्रम
माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘3 इडियट्स’चं बजेट सुमारे ५५ कोटी रुपये होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे २७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.
आता तब्बल अनेक वर्षांनंतर रँचो, राजू आणि फरहान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, सीक्वलची अधिकृत रिलीज डेट आणि कथानकाबाबतची माहिती निर्मात्यांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.