
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने ‘भाभीजी घर पर हैं!’ या मालिकेच्या निर्मात्यांसोबतच्या तिच्या वादावर पुन्हा एकदा मौन सोडले आहे. २०१६ मध्ये मालिका सोडल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी, या अभिनेत्रीने निर्माते संजय कोहली यांच्यावरील लैंगिक छळाचे आरोप खोटे असल्याचे कबूल केले. शिल्पाच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तिने तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले आणि तिची थकीत रक्कमही अदा करण्यात आली.
भारती सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात शिल्पा म्हणाली, “माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे मी माझ्या निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. अखेरीस, प्रकरण मिटल्यामुळे मी त्या परिस्थितीतून बाहेर पडले. त्यावेळी कोणत्याही निर्मात्याने मला पाठिंबा दिला नाही, म्हणून मी गुन्हा दाखल केला. पोलीस म्हणतात की एफआयआर दाखल करण्यासाठी तुम्हाला प्रकरण अतिरंजित करावे लागते. माझी कायद्याची पार्श्वभूमी आहे. त्याच आधारावर मी आज सांगत आहे की, तो आरोप खोटा होता. मी हे पहिल्यांदाच कबूल करत आहे. नंतर, आमच्या मानधनाचा हिशोब झाला आणि प्रकरण मिटले.”
शिल्पाने हे देखील उघड केले की, या वादामुळे दुखावलेल्या लेखक मनोज संतोषी यांच्या इच्छेमुळे ती एका दशकाहून अधिक काळानंतर या फ्रँचायझीमध्ये परतली. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, जे काही घडले त्या सर्व गोष्टींनंतरही, ती पुन्हा टीमसोबत काम करत आहे आणि आता तिचे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत.
नेमका वाद काय?
२०१६ मध्ये शिल्पा शिंदेने शो सोडल्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यावेळी, तिच्या करारावरून आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे झालेल्या वादामुळे शिल्पाने शो सोडला होता. शोच्या निर्मात्यांनी तिच्यावर अव्यावसायिक असल्याचा आरोप करत तिला कायदेशीर नोटीस पाठवली. त्या नोटीसला उत्तर देताना शिल्पाने निर्माती बिनाइफर कोहली आणि निर्माता संजय कोहली यांच्यावर आरोप केले. तिच्यावर एका कठोर करारासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही तिने केला. अखेरीस हा वाद तडजोडीने मिटला. नंतर शिल्पा ‘भाभीजी घर पर हैं!’ फ्रँचायझीमध्ये परतली.