
नाटक आणि सिनेमा तसा जिव्हाळ्याचा विषय हा तितका वेळ काढता येत नाही तो भाग वेगळा. तसे हलके फुलके किंवा कॉमेडी जॉनर आवडीचे आहेत पण कधीही आणि कितीही वेळा पाहावं वाटणाऱ्या सिनेमांमध्ये टॉपची दोन नावं म्हणजे मुंबई पुणे मुंबई आणि प्रेमाची गोष्ट. योगायोग म्हणजे दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक एकच सतीश राजवाडे.
काही पुस्तकं आणि सिनेमे असे काही असतात ना की, प्रत्येक वेळेला वाचावं पाहावं ते नवं काहीतरी देतात. ‘प्रेमाची गोष्ट’ त्यातलाच एक. एक सरळ साधी सोपी गोष्ट आणि साधे सोपे राम आणि सोनल. जनरली ना हिरो म्हटला की सॉलिड डॅशिंग, बॉडीबिल्डर, साधारण या पठडीतला दाखवला जातो. पण मनाने साधी, नाती जपणारी, प्रेम करणारी साधी असणारी अगदी राम आहे तसा अशीही काही मुलं असूच शकतात की एखाद्या सिमेमाचा आणि एखाद्या मुलीच्या आयुष्यातला हिरो. जुळून येती रेशीमगाठीमधला आदित्य, मुंबई पुणे मुंबईमधला गौतम आणि प्रेमाची गोष्टमधला राम, असंभव मालिकेतील विक्रांत यांच्या वागण्याशी मिळती जुळती मुलं असूच शकतात हिरो. आणि प्रेमाची गोष्टमधली सोनल सारखी साधी रसळ आणि परखड विचारांची मुलगी कोणालाही वाटेल आपलीशी. मुंबई पुणे मुंबई असो किंवा प्रेमाची गोष्ट जिथे प्रेम येतं ती गोष्ट राजवाडे खूप सुंदर सांगतात सिनेमातून.
आपण कोणासाठी तरी थांबणं जसं प्रेम आहे तसंच आपल्यावर प्रेम करणारी माणसं पण ओळखता यायला हवीत. रागिणीसाठी थांबलेला राम आधी जितका जेन्यून वाटतो तितकाच सोनल आयुष्यात आल्यावर तिचं जीव लावणं, तिची धडपड तिच्याबद्दल जे वाटतंय स्वीकारणारा राम त्यातही प्रेमच आहे.
खूपदा वाटतं या सगळ्या कथा फक्त सिनेमात होतात. पण परत राम म्हणतो ते आठवतं सिनेमाच्या गोष्टी आकाशातून येत नाही, त्या आपल्याच अवती भवती असतात फक्त शोधाव्या लागतात. माणसं असतात पॅशनेट नाती जपण्यात, प्रेमात म्हणून तर ते लिहिण्यातून सिनेमातून दिसतं. प्रेम चुकीचं नसतं ज्याच्यावर आपण प्रेम करतो काही वेळेस व्यक्ती चुकीची असू शकते पण प्रेम ही भावना कधीच चूक नसते. पण तेच एक निवड चुकली म्हणून आयुष्य थांबत नाही थांबून राहत नाही आणि ठेऊ देखील नये.
स्वप्नांच्य़ा मागे पळणाऱ्या रागिणीला रामचं तीळ तीळ तुटणं कळत नाही आणि स्वत:चाच हेका मिरवणाऱ्या समितला सोनलचं मन कधी जपता आलं नाही. पण प्रेम योग्य त्या वळणावर तुम्हाला भेटतच. आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे रागिणी आणि समितसारखी जी दाखवून देतात की सगळीच माणसं आपल्यासाठी नसतात काही जणं एका ठराविक वेळेनंतर आपला हात सोडून निघून जातात. तसंच दुसऱ्या प्रकारची माणसं देखील योग्य वळणार आयुष्य़ात येतात देखील जे पटवून देतात परिस्थिती किती ही खराब असो सगळेच सोडून नाही जात. आपल्यावर जीव लावणारी, आपली माणसं भांडतात, रुसतात रागावतात पण सोबत राहतात श्वासांची माळ तुटत नाही तोवर. सिनेमाची स्टोरी अगदी सामान्य माणसाला आपलीशी वाटावी आपल्या प्रेमाची गोष्ट वाटावी इतकी सरळ साधी आहे. ‘
एक निर्णय चुकल्याने आयुष्यात हरलेल्या सोनलला राम भेटतो आणि तिच्यातली ती पुन्हा तिला नव्याने सापडते. मन आणि बुद्धीच्या भांडणात कायमच बुद्धीचं ऐकणाऱ्या रामने आजवर मन मारुन किती आयुष्य जगलं स्वत:च्या स्वप्नांना सोडलं. पण जग तू, तुला जे हवं जी तुझी ओळख आहे तू जप, तुझं लिहिणं तुझी ओळख आहे हे रामपटवून देणारी सोनल. सगळं किती खरं आणि प्रामाणिक वाटतं. प्रेम प्रेम म्हणजे नक्की तरी काय महागड्य़ा डेट्स किंवा गिफ्ट नाही. ज्याच्यावर आपण जीवापलिकडे प्रेम करतो त्याला त्याची ओळख मिळवून देणं. जिथे नातं टिकवण्याची धडपड दोन्ही बाजूने असतं ते प्रेम. अगदी सोनल आणि रामच्या नात्यासारखं. प्रेम कधीअस्तित्व मिटवत नाही तुम्हाला जगायचं शिकवतं. आपल्याबरोबर समोरच्या पार्टनरचं अस्तित्व जपायला शिकवतं. नुकतंच या सिनेमाला 13 वर्ष पूर्ण झाली. पण राम आणि सोनलची ही लव्हस्टोरी आजही तितकिच एव्हरग्रीन आहे. सिनेमाच्या स्टोरी प्रमाणेच काळजाचा ठाव घेणारं गाणं म्हणजे ओल्या सांजवेळी. खास करुन सांगाय़चं तर,
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊदे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊदे काय कमाल लिहिलंय अश्विनी शेंडेनी. अतुल कुलकर्णी यांच्या विषयी नटरंग पाहिल्यापासून आदर होता पण प्रेमाची गोष्टमधल्य़ा राम व्यक्तिरेखेतले अतुल कुलकर्णी जास्त आवडतात. ना कुठला सो कॉल्ड मेलो ड्रामा ना कुठल्या हाणामारी तरीही कितीही वेळा पाहिला तरी नव्याने प्रेमात पाडतो हा सिनेमा. कारण प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे.