( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Marathi Natak: मराठी रंगभूमीवर दर्जेदार आणि आशयपूर्ण नाटकांची परंपरा जपणाऱ्या सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन नाटकांनी सध्या नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘जर तर ची गोष्ट’ आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या दोन्ही नाटकांना महाराष्ट्रासह देश-परदेशातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही नाटकांनी आता महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत.
‘जर तर ची गोष्ट’चा ४०० वा प्रयोग १६ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात सकाळी ११ वाजता, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ५० वा प्रयोग ३० ऑगस्ट रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात दुपारी ४ वाजता रंगणार आहे. त्यामुळे सोनल प्रॉडक्शन्सच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले जाणार आहेत.
प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाने आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि दमदार अभिनयामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादरकर व रणजित पाटील दिग्दर्शित या नाटकाचे आतापर्यंतचे अनेक प्रयोग हाऊसफुल्ल ठरले आहेत.
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता १६ ऑगस्टला ४०० वा प्रयोग रंगणार असल्याने नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकानेही रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांमधील गंमतीदार प्रवास या नाटकातून उलगडतो.
प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित या नाटकाचा ५० वा प्रयोग ३० ऑगस्ट रोजी दीनानाथ नाट्यगृहात रंगणार आहे. या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन अमोल पाटील यांचं असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचं आहे.
या दोन्ही नाटकांच्या यशामागे नात्यांशी जोडलेला भावनिक धागा महत्त्वाचा ठरला आहे. ‘जर तर ची गोष्ट’मधून तरुणाईच्या नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम, अपेक्षा आणि बदलत्या भावविश्वाचा वेध घेतला आहे. तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’मध्ये तीन पिढ्यांमधील नाती, विचार आणि बदलती जीवनशैली यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करण्यात आलं आहे.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, आपली माणसं, नात्यांमधील गैरसमज, प्रेम, अपेक्षा आणि भावभावना यांचं प्रतिबिंब दोन्ही नाटकांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे ही नाटकं प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. मनोरंजनासोबतच नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत आहेत.
या दोन्ही नाटकांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल निर्माते नंदू कदम म्हणाले, “नाटक करणं ही आमच्यासाठी केवळ व्यावसायिक गोष्ट नाही, तर रसिकांशी जोडला जाणारा भावनिक प्रवास आहे. ‘जर तर ची गोष्ट’ आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या दोन्ही नाटकांना प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने स्वीकारलं, ते आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे.”
दोन्ही नाटकांचे विषय वेगळे असले तरी त्यांचा केंद्रबिंदू नातेसंबंध असल्याने प्रत्येक प्रेक्षकाला त्यात स्वतःचं किंवा आपल्या आसपासच्या माणसांचं काहीतरी दिसतं, असंही त्यांनी सांगितलं.
४०० वा आणि ५० वा प्रयोग हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं नंदू कदम यांनी म्हटलं. महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी रसिकांचे आभार मानले.
एकाच निर्मिती संस्थेची दोन नाटकं, दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील नात्यांचा वेध आणि दोन्ही कलाकृतींना मिळणारं भरभरून प्रेम, हीच सोनल प्रॉडक्शन्सच्या यशाची खासियत ठरली आहे.





