
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरांत पोहोचला लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे. मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून मंदार कडे पाहिलं जात. पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्याच्यकडे जवळपास 4 ते 5 वर्ष काहीच काम नव्हतं. आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
राजश्री मराठीशी संवाद साधताना मंदार जाधव म्हणाला, “मी लहानपणी खूप हट्टी होतो. पण आयुष्यात असा एक काळ आला, ज्याने मला संयम शिकवला. चार-पाच वर्षांचा तो काळ खूप मोठा होता. ज्या वयात कलाकाराचं करिअर घडतं, त्या वयात मी घरी बसलो होतो. माझ्याकडे कोणतंच काम नव्हतं. त्यावेळी मला वाटायचं की, आपण इतरांपेक्षा कमी आहोत. आपल्याला काहीच जमत नाही, आपण सक्षम नाही… असे अनेक नकारात्मक विचार मनात येत होते.”
‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला होता’
मंदारने पुढे सांगितले की, त्या काळात तो इतका मानसिक तणावाखाली होता की त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचाही विचार आला होता.
“माझ्या आई-वडिलांनाही ही गोष्ट माहिती नाही. पण आज मी पहिल्यांदाच सांगतोय. आमचं घर नवव्या मजल्यावर होतं. एक दिवस बाल्कनीत उभा राहिलो आणि खाली उडी मारावी असा विचार मनात आला. पण लगेच दुसरा विचार आला… जर मी चुकून वाचलो आणि हात-पाय मोडले, तर आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागेल. मृत्यू झाला तर एकदाच सगळं संपेल, पण वाचलो तर परिस्थिती आणखी कठीण होईल. त्या विचाराने मी स्वतःला थांबवलं,” असे तो म्हणाला.
‘अलादीन’नंतरही नव्हतं काम
मंदारने सांगितले की, यशस्वी ‘अलादीन’ प्रकल्पात काम करूनही त्याच्याकडे पुढील काही वर्षे काम नव्हते. त्यामुळे आत्मविश्वास ढासळला आणि नैराश्य अधिक वाढले. मात्र, काळानुसार त्याने स्वतःला सावरलं आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली.
आज मंदार आपल्या त्या काळाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. संघर्षातून बाहेर पडत त्याने स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला असून, त्याचा हा अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मराठी अभिनेता मंदार जाधव याने आयुष्यातील अत्यंत कठीण आणि भावनिक काळाबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.