
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. अक्कलकोटच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिवनाथ आणि राधाच्या बाळाभोवतीचं गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. स्वामींना हे बाळ त्याच्या आई-वडिलांपासून दूर का करायचं आहे? बाळावर स्वामी स्वतःचा अधिक अधिकार का सांगत आहेत? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत.
दरम्यान, चावडीवर सुभेदारांनी स्वामींना स्पष्ट ताकीद दिली आहे. “चार दिवसांत हा अध्याय संपवा, अन्यथा तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला शिक्षा करावी लागेल,” असा इशारा सुभेदारांनी स्वामींना दिला आहे. मात्र, स्वामी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं गूढ स्मित पाहून त्यांच्या मनात नेमकं काय आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, नागपंचमीच्या निमित्ताने मालिकेच्या कथानकाला आणखी एक दिव्य आणि अनपेक्षित वळण मिळणार आहे. स्वामींच्या भविष्यवाणीनुसार शिवनाथ आणि राधाला नागपंचमीच्या दिवशी एका मोठ्या ‘प्रचिती’चा अनुभव येणार आहे. स्वामींच्या स्थानावर घडणाऱ्या अद्भुत घटनांमुळे भक्त भारावून जाणार आहेत.
एका बाजूला श्रद्धा, भक्ती आणि स्वामींचे दिव्य संकेत पाहायला मिळणार असताना दुसरीकडे सदाशिव आणि रेणुकाच्या आयुष्यातील संकटही अधिक गडद होत आहे. त्यामुळे आगामी भागात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
स्वामींच्या “बाळाच्या आयुष्यातले काटे आम्ही बाजूला करणारच” या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज शिवनाथ आणि राधाला स्वामी आपल्या बाळासाठी धोका असल्याचं वाटत आहे. मात्र, स्वामींच्या कृतीमागचं खरं कारण त्यांना कधी समजणार? स्वामी बाळाला आपल्यापासून दूर का ठेवू पाहत आहेत, याचं गूढ लवकरच उलगडणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
या सर्व घडामोडींमागे मार्तंडचा डावही महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामींचं युग संपवण्याच्या आपल्या छुप्या अजेंड्यासाठी मार्तंडने शिवनाथच्या आरोपांना धार दिली आहे. त्याने सुभेदारांचं लक्ष स्वामींविरोधातील प्रकरणाकडे वळवलं असून, आता सुभेदारांनी स्वतः स्वामींना चार दिवसांची मुदत दिली आहे.
त्यामुळे मार्तंडच्या डावाला पहिल्यांदाच मोठं यश मिळालं आहे. मात्र, स्वामींच्या सामर्थ्यापुढे मार्तंडचा हा डाव कितपत यशस्वी होणार, हा प्रश्न आहे. स्वामींचं युग संपवण्याचं मार्तंडचं स्वप्न पूर्ण होणार की त्याचाच डाव त्याच्यावर उलटणार, हे आगामी भागांत स्पष्ट होईल.
आता स्वामी बाळासाठीचा आपला हट्ट सोडणार का? शिवनाथ-राधाला स्वामींच्या असामान्य मागणीमागचं सत्य समजणार का? की अक्कलकोटला हादरवणारा निर्णय घेत स्वामींनाच शिक्षेला सामोरं जावं लागणार? नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या या निर्णायक पर्वात या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.