
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहेत. काही कलाकारांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे, तर काहींनी हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, अनघा भगरे आणि मृणाल दुसानीस यांच्यानंतर आता लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिनेही हॉटेल व्यवसायात नवी इनिंग सुरू केली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या माधवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली. तिच्या हॉटेलचं नाव ‘कल्याणमस्तु’ असं असून, हे हॉटेल कल्याण येथे सुरू होणार आहे.
माधवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत, “मोठी घोषणा… काहीतरी मोठं… लवकरच!” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमधून तिने नव्या व्यवसायाची झलक दाखवली असून, हॉटेलविषयीची अधिक माहिती ती लवकरच चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याचं सांगितलं आहे.
माधवीच्या या नव्या प्रवासाचं चाहत्यांनी आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उत्साहाने स्वागत केलं आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अभिनयासोबत व्यवसायातही ती यशस्वी ठरो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता माधवी निमकर उद्योजिका म्हणूनही नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘कल्याणमस्तु’ या नव्या हॉटेलबाबतची अधिकृत माहिती आणि उद्घाटनाची तारीख जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिका शालिनीची भूमिका साकारून माधवी निमकर घराघरात पोहोचली. तिच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आणि तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
माधवीने याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘कुंकू’ आणि ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यासोबतच तिने मोठ्या पडद्यावरही आपली छाप पाडली आहे. ‘पावनखिंड’, ‘संघर्ष’ आणि ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
सध्या माधवी ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून, अभिनयासोबतच आता ‘कल्याणमस्तु’ या हॉटेलच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रातही तिने नवी इनिंग सुरू केली आहे.