( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Maharashtra Mandal Mauritius Exhibition: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या दमदार अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या ऐश्वर्या यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या आगामी मालिकेची चाहत्यांना उत्सुकता असतानाच त्या सध्या एका खास कारणामुळे मॉरिशसमध्ये आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडेसोबत त्यांनी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
अभिनयासोबतच ऐश्वर्या नारकर यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. ऐश्वर्या, तितीक्षा तावडे आणि सुरूची अडारकर या तिघींनी मिळून ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ या साड्यांच्या ब्रँडची सुरुवात केली. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या या ब्रँडला अल्पावधीतच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, आकर्षक आणि वेगवेगळ्या कलेक्शनमुळे हा ब्रँड चर्चेत आहे.
सध्या ऐश्वर्या आणि तितीक्षा मॉरिशसमध्ये आयोजित महाराष्ट्र मंडळाच्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. याबाबत दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या दौऱ्यामागचं कारण चाहत्यांना सांगितलं.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “आम्ही दोघी सध्या मॉरिशसमध्ये आहोत. महाराष्ट्र मंडळाचं प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आलं असून भारतातील अनेक उद्योजक यात सहभागी झाले आहेत. ज्वेलरी, खाद्यपदार्थ, लहान मुलांचे कपडे, साड्या, शोभेच्या वस्तू अशा विविध उत्पादनांचे स्टॉल येथे आहेत. त्यामध्ये आमच्या ‘थ्रेड अँड ठुमका’ ब्रँडचाही स्टॉल आहे. आमच्या साड्यांच्या ब्रँडचं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे.”
दोघींनी पुढे सांगितले की, “लकी ड्रॉद्वारे स्टॉलचे क्रमांक ठरवण्यात आले आणि आमच्या स्टॉलला पहिला क्रमांक मिळाला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.”
यावेळी त्यांनी सुरूची अडारकरबाबतही माहिती दिली. “काही कारणास्तव सुरूची आमच्यासोबत येऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही दोघीच मॉरिशसमध्ये आलो आहोत. आम्ही फक्त दोन दिवस इथे थांबणार आहोत. त्यानंतर भारतात परतणार आहोत, कारण ‘नाईकबाई’ मालिकेचं शूटिंग सुरू आहे,” असे ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी सांगितले.
View this post on Instagram
अभिनयासोबतच उद्योजक म्हणूनही ऐश्वर्या नारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली ही झेप चाहत्यांकडून कौतुकास्पद ठरत असून, थ्रेड अँड ठुमका By Tasvi’च्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे त्यांच्या ब्रँडला जागतिक व्यासपीठ मिळाल्याची चर्चा आहे






