
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ सध्या प्रचंड तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दिग्रसकर वाड्यात एकामागोमाग होणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे प्रेक्षकांच्या थराराची पातळी वाढली आहे.श्रीकला भोवती असलेली शंका हळूहळू एका मोठ्या रहस्याकडे इशारा करते. तिचा खरा हेतू, भूतकाळातील गोष्टी आणि दिग्रसकरांविरुद्ध असलेले मनसुबे अखेर सगळ्यांसमोर येणार आहेत.
श्रीकलाबाबत इंदू आणि आनंदीच्या लक्षात आलेल्या काही संशयास्पद हालचाली, एका अनोळखी व्यक्तीची अस्पष्ट झलक आणि त्यातून उघड होत जाणारे धागेदोरे इंद्रायणीच्या शंकेला अधिकच बळ देतात आणि एका मोठ्या खुलाशाकडे येऊन पोहोचतात. इंद्रायणी आणि आनंदीकडे आता श्रीकलाविरुद्ध बरेच पुरावे आहेत. ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अख्ख्या दिग्रसकरांसमोर श्रीकलाचा पर्दाफाश होणार आहे.
इंद्रायणी ठामपणे श्रीकलाकडे बोट दाखवत, “आज सगळ्यांना कळालंय… ही श्रीकला किती…!” असं म्हणताच वाड्यात खळबळ उडते. शकुंतलाचा कापऱ्या आवाजातला सवाल, आनंदीबाईंचा कठोर निर्णय आणि श्रीकलाची गोंधळलेली अवस्था या सगळ्यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होते. श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येताच तिला घराबाहेर काढण्यासाठी पाऊल उचलले जात असतानाच अचानक पोपटरावांचा प्रवेश होतो. ते श्रीकलाच्या बाजूने उभे राहत ठाम इशारा देत सगळ्यांना आव्हान देतात की, “घराबाहेर श्रीकला नाही… तुम्ही सगळे जाणार… आत्ताच्या आत्ता!” हा हस्तक्षेप केवळ वाद थांबवत नाही, तर आणखी मोठ्या रहस्याची चाहूल देतो. पोपटराव, श्रीकला आणि या सगळ्या घडामोडींचा नेमका संबंध काय? दिग्रसकर कुटुंबासमोर उभे राहिलेले अनेक प्रश्न मोठ्या संकटाचं वादळ घेऊन येणार आहेत.
हादरवून टाकणारे धक्कादायक खुलासे आणि नाट्यमय वळणांसह ‘इंद्रायणी’ मालिका आता एका जबरदस्त टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई