
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठी नेहमीप्रमाणे आपल्या नव्या मालिकांच्या लाँचवेळी काहीतरी वेगळा आणि लक्षवेधी उपक्रम सादर करत असते. यावेळी ‘दीपज्योती’ या नव्या मालिकेच्या पत्रकार परिषदेतही असाच एक खास आणि प्रेरणादायी कार्यक्रम पाहायला मिळाला.ही पत्रकार परिषद केवळ औपचारिक न राहता एक भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिला कुटुंब चालकांची उपस्थिती लाभली.
त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच संवेदनशीलता आणि अर्थ प्राप्त झाला. ‘दीपज्योती’च्या लाँचमुळे झी मराठीच्या या नव्या मालिकेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘दीपज्योती’ ही प्रेमाने आणि आपुलकीने बांधलेल्या बहीण-भावांच्या नात्याची कथा आहे. ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांच्याभोवती ही गोष्ट फिरते. दुसरीकडे, पुरुषोत्तम यांच्या घरंदाज कुटुंबाची कथा उलगडते. त्यांचे तीन मुलं, स्वराज, दीप आणि विराज आणि त्यांच्यासोबत आत्या असते. स्वराज वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यास उत्सुक आहे, तर विराज आपल्या नोकरीत समाधानी आहे. मात्र, दीपच्या मनात वडिलांविषयी राग आहे. लहानपणी आईच्या निधनासाठी त्यालाच जबाबदार ठरविल्याने पुरुषोत्तम त्याचा तिरस्कार करतात.
या मालिकेच्या पत्रकार परिषदेत महिला कुटुंब चालकांनी (रिक्षा चालक) ज्योतीसोबत रिक्षा चालवत तिच्या संघर्षाला सलाम केला. काहींनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी आपल्या आवडीपोटी हे क्षेत्र निवडल्याच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. या कथा ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाले. या धाडसी महिलांना खास कस्टमाइज्ड ‘पदरावर रिक्शा असलेली पैठणी’ भेट देण्यात आली. तसेच उपस्थित रिक्षा चालक महिलांसाठी सर्वांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकार प्रसाद जवादे, पूर्वा कौशिक, अनुप बेलवलकर आणि मानसी सुभाष हे महिला प्रेक्षकांच्या तसेच मीडिया प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून गेले. त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
‘दीपज्योती’ या मालिकेत दीप आणि ज्योती यांच्या मुख्य भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.तसेच या मालिकेत डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचे लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केले असून संवादलेखन इरफान मुजावर यांनी केले आहे. मालिकेचे दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केले आहे.