
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Nepal Flood: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. पुरामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच महापुराच्या संकटात अभिनेत्री मानसी पारेखही अडकली होती. मात्र, सुदैवाने ती सुखरूप भारतात परतली आहे. नेपाळमधील या भयावह अनुभवाबद्दल मानसीने आता भाष्य केलं असून, तिने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मानसी पारेख कैलास मानसरोवर यात्रा करून सुखरूप मुंबईत दाखल झाली आहे. यात्रेदरम्यान नेपाळमध्ये ती बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, आता मानसी सुखरूप मुंबईत परतली आहे.
मानसी पारेख ही ईशा फाऊंडेशनच्या ९३ सदस्यांच्या समूहासोबत भारतात परतली. मुंबई विमानतळावर पोहोचताच तिच्या कुटुंबीयांनी तिला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला. कुटुंबीय आणि मानसी यांच्यातील भावूक भेटीचा क्षणही पाहायला मिळाला.
‘इंडिया टीव्ही’शी संवाद साधताना मानसी पारेखने कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, हा प्रवास खूप लांब आणि कठीण होता.
तिने सांगितलं, “तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर एक भलीमोठी इमिग्रेशन बिल्डिंग आहे. सात दिवसांपूर्वीच आम्ही याच बिल्डिंगमधून चीनमध्ये प्रवेश केला होता.”
पुढे बोलताना मानसीने सांगितलं की, कैलास यात्रा संपल्यानंतर ते लगेच चीनमधून बाहेर पडणार होते. मात्र, त्याच्या अवघ्या २४ तास आधी नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली.
मानसीने या आपत्तीची भीषणता सांगताना म्हटलं की, घटनांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना काहीच सुचत नव्हतं. एवढी मोठी इमारतही पुराच्या पाण्यात वाहून गेली. इतकंच नाही तर संपूर्ण गावच वाहून गेल्याचं तिने सांगितलं.
“२४ तासांत संपूर्ण गाव नाहीसं झालं होतं. तो आमच्यासाठी खूप वाईट अनुभव होता. त्यावेळी जाणवलं की आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. आयुष्य खूप अनिश्चित आहे,” असं मानसीने सांगितलं.
पूरग्रस्त परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध घेणं अत्यंत कठीण झाल्याचंही मानसीने सांगितलं.
पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काही लोक तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत वाहून गेल्याचं तिने नमूद केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर येईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. ही एक नैसर्गिक आपत्ती असून ती कोणीही टाळू शकत नाही, असंही मानसीने म्हटलं.
“हा एक अविश्वसनीय अनुभव होता. हे खूप दु:खद आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी
कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान मानसी पारेख बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते चिंतेत होते. तिच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. नेपाळमधील दुर्घटनेच्या काही तास आधी मानसीने सोशल मीडियावर आपल्या मानसरोवर यात्रेतील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
दरम्यान, मानसी सुखरूप भारतात परतल्याने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या यात्रेदरम्यान तिने अनुभवलेली नेपाळमधील महापुराची भीषणता तिच्या मनावर कायमची कोरली गेली आहे.