
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
राणी मुखर्जीचा विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मान
मराठमोळ्या लूकने राणी मुखर्जीने वेधलं लक्ष
अभिनेत्रीने केलं मराठीत भाषण
Rani Mukerji: मुंबईत ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सन २०२५ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना देण्यात आला. याशिवाय अभिनेत्री राणी मुखर्जीला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं.
पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीने आपल्या खास अंदाजाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये राणीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. तिच्या या मराठमोळ्या अंदाजाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मात्र, राणीच्या लूकपेक्षाही तिच्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीतून केली.
राणी मुखर्जी म्हणाली, “नमस्कार, माझ्यासाठी महाराष्ट्र फक्त एक राज्य नाहीये, तर हा महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे आणि हीच माझी कर्मभूमी आहे. ही भूमी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. याच शहरात माझा जन्म झाला. मी लहानाची मोठी झाले, अशी ही आपली मायानगरी मुंबई.”
“आयुष्याचे धडे मिळाले आणि सिनेमाबद्दलची शिकवणसुद्धा मला याच शहरामुळे मिळाली. यश-अपयश सगळं काही मी या भूमीवर पाहिलं. त्यामुळे आजचा हा सन्मान माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. कारण हा सन्मान मला माझ्या आपल्या लोकांकडून मिळाला आहे,” असं राणीने सांगितलं.
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना राणी म्हणाली की, तिने अगदी कमी वयात इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी तिच्या पाठीशी कोणाचंही पाठबळ नव्हतं. मात्र, तिने आपल्या कामावर विश्वास ठेवत प्रवास सुरू ठेवला.
“मी फक्त माझं काम मनापासून करत राहिले. माझ्यासाठी सिनेमा म्हणजे लोकांना समजून घेण्याचं एक माध्यम आहे,” अशी भावना राणीने व्यक्त केली.
राणी पुढे म्हणाली, “मला अनेकदा असंही विचारलं जातं की, तुम्ही जाणूनबुजून वुमन सेंट्रिक सिनेमे निवडता. पण असं नाहीये. मी अशा भूमिका निवडते, ज्या खऱ्या असतील आणि त्या भूमिकांचा प्रवास प्रेक्षकांना खरा वाटेल.”
“मी सिनेमाकडे कधीच एक प्रोफेशन म्हणून पाहिलं नाहीये. माझ्यासाठी सिनेमा म्हणजे अत्यंत भावनिक विषय आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या त्या भावनेचं मूळ घर आहे,” असंही तिने म्हटलं.
आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा उल्लेख करत राणीने मुंबईशी असलेलं नातंही उलगडलं. ती म्हणाली, “महाराष्ट्र म्हणजे माझी जन्मभूमी अन् कर्मभूमी आहे, हे वाक्य केवळ पुरस्कार सोहळ्यापुरतं म्हणत नाहीये. मी हे इतक्या ठामपणे म्हटलं कारण माझा या वाक्यावर विश्वास आहे.”
“मुंबई शहराने माझं बालपण पाहिलं. आधी मी लहान मुलगी होते, मग अभिनेत्री, पत्नी आणि आता मी आईच्या भूमिकेत आहे. या शहराने खूप काही दिलं आणि आयुष्यात कधीही माघार घेऊ नकोस हा विश्वास दिला,” असं राणीने सांगितलं.
आपल्या भाषणाच्या शेवटी राणीने हा पुरस्कार महाराष्ट्रातील नागरिक, कलाकार आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला समर्पित केला.
“हा पुरस्कार मी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना, दिग्दर्शकांना आणि आमच्या फिल्म इंडस्ट्रीला डेडिकेट करते. या पुरस्कारासाठी कायम माझ्या मनात एक वेगळी जागा असेल. कारण या अवॉर्डकडे पाहून मला माझी मुंबई आणि माझा महाराष्ट्र कायम आठवेल,” असं तिने म्हटलं.
“तुमचं प्रेम असंच राहू द्या, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या… खूप-खूप धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र!” अशा शब्दांत राणी मुखर्जीने आपल्या भावना व्यक्त केल्या.