
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नाट्य संस्था, महाविद्यालये आणि हौशी कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुख्य शाखा मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे पडघम वाजले आहेत. साताऱ्यातही या स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, जिल्ह्यातील हौशी नाट्य कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नाट्य संस्थांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.
शंभराव्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून उत्सव रंगभूमीचा, जागर हौशी नाट्य कलावंतांचा’ या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या महोत्सवाचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे. नवोदित आणि हौशी कलाकारांना रंगभूमीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालये तसेच विविध नाट्य संस्थांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेचे आयोजन प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्या संघाला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, इतर विजेत्यांनाही भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील हौशी कलावंत आणि महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. स्पर्धेची अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.
ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुकांना नाट्य परिषदेच्या [www.natyaparishad.org] या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार आहे.
सातारा केंद्रप्रमुख म्हणून राजेश कुंभारदरे, तर सातारा स्थानिक समन्वयक म्हणून बाळकृष्ण शिंदे आणि आनंद ऊर्फ बाळू कदम काम पाहत आहेत. जिल्ह्यातील नाट्यप्रेमी, हौशी कलाकार आणि महाविद्यालयांनी या संधीचा लाभ घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.