
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shabana Azmi Health: दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती बिघडली. आंदोलनावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर त्यांना अस्थमाचा झटका आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
२० जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ मोर्चात शबाना आझमी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सहभागी झाल्या होत्या. या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आणि अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. याचवेळी अश्रुधुराच्या संपर्कात आल्याने शबाना आझमी यांची प्रकृती अचानक बिघडली.
‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, “मला अस्थमा आहे. अश्रुधुरामुळे मला त्याचा झटका आला. मात्र माझ्याकडे इन्हेलर (पंप) असल्यामुळे मला लवकर आराम मिळाला आणि आता मी पूर्णपणे ठीक आहे.”
प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जवळील एका इमारतीत नेण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारताच त्या पुन्हा आंदोलनस्थळी परतल्या आणि जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला.
विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, “त्यांचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. मी त्यांच्या संघर्षाला सलाम करते.”
शबाना आझमी यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी आणि त्यांचे पती, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, यांनी यापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शबाना आझमी यांनी प्रकाश राज आणि इतर आंदोलकांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे सांगितले.
राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं होते ताब्यात
नीट पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. 20 जुलैला सुरू असलेल्या या मोर्चात तरूण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरूण आंदोलकांना व विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर कॉंग्रेसने आक्रमक होत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आंदोलन केलं. विशेष म्हणजे या आंदोलनाबद्दल पोलिसांना कळू नये, ही काळजी कॉंग्रेसने घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वांना तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना आंदोलनाची माहिती देण्यात आली आणि जवळपास दोन तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.