AAP leader Arvind Kejriwal criticizes Amit Shah for making Delhi a crime capital
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निव़डणूकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून आप, भाजप व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा दिल्लीमध्ये हॅटट्रीक मारणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आप जोरदार प्रचार करत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून आपने प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या जोरदार प्रचार करत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप पक्षावर अनेक घणाघाती प्रहार केले. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री व भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीला गुन्ह्यांची राजधानी बनवली असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भाजप आता धरणे पक्ष बनला आहे. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की भाजप रोहिंग्यांच्या नावाखाली पूर्वांचलमधील लोकांची मते कापत आहे. भाजप दिल्लीतील लोकांचा द्वेष करते. म्हणूनच गेल्या 25 वर्षांपासून ते दिल्लीत पुन्हा सत्तेत येऊ शकलेले नाहीत. भाजपने दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले आहे. चोरी, चेन स्नॅचिंग आणि टोळीयुद्धाच्या घटनांमध्ये वाढ झाली. आता महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
पुढे केजरीवाल म्हणाले की, “त्यांना लढणे, निषेध करणे आणि निरुपयोगी मुद्दे निर्माण करणे याशिवाय काहीही करायचे नाही. त्यांनी दिल्लीच्या लोकांसाठी कधीही काहीही केले नाही, म्हणूनच मतदार त्यांना निवडणुकीत मतदान करत नाहीत. दिल्लीमध्ये गुन्हेगारी इतकी वाढली आहे की लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. जर दिल्लीत कोणाला त्रास होत असेल तर माझ्या हृदयात मला वेदना होतात. गुन्हेगारी वाढत आहे, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काहीही करत नाहीत,” असा घणाघात अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्ली निवडणूक संबंधी अपडेट एका क्लिकवर
त्याचबरोबर त्यांनी भाजपबाबत काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. केजरीवाल म्हणाले की, “गेल्या १० वर्षात भाजपने दिल्लीतील अनधिकृत वसाहतींसाठी काय केले आहे? त्यांनी एकही रस्ता किंवा एकच लेन बांधली आहे का? इतकी सत्ता आणि पैसा असूनही त्याने काय केले? आप सरकारने या वसाहतींमध्ये गटार जोडणी, वीज जोडणी, पाण्याच्या पाईपलाईन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. शाळा, गल्ली दवाखाने, रुग्णालये उघडली. मी त्यांना एक सन्माननीय जीवन दिले. भाजपने घाणेरडे राजकारण करण्याशिवाय दुसरे काय केले आहे?” असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.