
'आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील'; 'या' खासदाराने केलं मोठं विधान
मुंबई : शिवसेना पक्षातील फूट, पक्षाचे नेतृत्व आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला आता महत्त्वाचे वळण मिळताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ‘घटना सादर केल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. पक्षाची घटना तयार करूनच पक्ष चालवला गेला. निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष ५ हजार कोटी रुपयांना विकला. त्याचे आकडे आम्ही पुढील काळात देऊ, असे संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने पक्ष विकण्याच्या भूमिकेत दलालाची भूमिका बजावली. आयोगाने आतापर्यंत चार पक्ष विकले आहेत. भ्रष्टाचाराला पुरावे असतात का? पक्ष विकला, हाच पुरावा आहे. हा निकाल आगामी काळात माईलस्टोन ठरेल. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयाला कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. समोरची बाजू सेटिंगवर आहे. आम्हाला प्रॉमिस आहे, असं समोरची बाजू सांगते. प्रॉमिस कोणाचं आहे, ते त्यांनी आधी जाहीर करावं. मग मी अमित शाह यांचं संसदेत बघतो’.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले, अमित शाह खोटं बोलत आहेत. आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील, हे मी खूप धाडसाने सांगत आहे. अमित शाह यांचे हात काल लटपटत होते. शाह यांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि याला मोदींनी विरोध केला आहे. मोदींनंतर शाह नसतील, हे नक्की आहे. मोदी किती काळ टिकतील, हे माहीत नाही. पुढील आंदोलन ईव्हीएमविरोधी असेल. या देशातील तरुणांनी तसं ठरवलं आहे, ही माझी माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मराठी भाषा आलीच पाहिजे
मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘कोणत्याही राज्यात जाता, तिथली भाषा शिकली पाहिजे. दिल्लीत येऊन आम्ही हिंदीत बोललो नाही, तर काय होईल? महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी आली पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले आहे.