काँग्रेसच्या कार्यक्रमात गायले बांगलादेशचे राष्ट्रगीत; नव्या वादाची ठिणगी? व्हिडिओ व्हायरल
Bangladesh National Anthem controversy: आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यक्रमात “आमार सोनार बांगला” गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले हे गाणे बांगलादेशचे राष्ट्रगीत देखील आहे. भाजपने या गाण्यावर टीका करत काँग्रेस “ग्रेटर बांगलादेश” साठी मार्ग मोकळा करत असल्याचा आरोप केला आहे.
आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. श्रीभूमी येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘अमर सोनार बांगला’ गायले गेल्याचा आरोप त्यांनी केला. सिंघल म्हणाले, “हा तोच देश आहे जो ईशान्येकडील भाग भारतापासून वेगळा करण्याचे प्रयत्न करतो. काँग्रेस पक्षाने अनेक दशकांपासून आसाममध्ये बेकायदेशीर स्थलांतराला परवानगी दिली आणि त्याला प्रोत्साहनही दिले, हे आता स्पष्ट झाले आहे. राज्याची लोकसंख्या बदलण्यासाठी आणि ‘ग्रेटर बांगलादेश’ तयार करण्यासाठी काँग्रेसने मतदारसंघाच्या राजकारणाचा वापर केला. व्होट-बँकेसाठी देशविघातक कारवायांना खतपाणी घालणारे हे धोरण आहे.” सिंघल यांच्या या वक्तव्यानंतर आसामच्या राजकारणात नवीन वादळ उठले आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
भारत आणि बांगलादेशमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेत त्यांना एक पुस्तक भेट दिले होते. दरम्यान, “आर्ट ऑफ ट्रायम्फ: बांगलादेश न्यू डॉन” या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील बांगलादेशाच्या नकाशात भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुराचे काही भाग दाखवण्यात आला होता. त्यामुळेही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.
म्हातारपणासाठी Jackpot पोस्ट ऑफिस स्किम! निवृत्तीनंतर दरमहा मिळणार 11,000 रूपयांचे Pension
गेल्या तीन दिवसांपासून बांगलादेशसोबतच्या आसाम सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेश बॉर्डर गार्ड (BGB) कुशियारा नदीच्या या बाजूला भारतीय हद्दीत बांधल्या जाणाऱ्या मंदिरावर लक्ष ठेवून आहे. सीमारेरेषेवरील BDF जवान देखील त्यांना तोंड देण्यासाठी सतर्क आहेत. ही घटना आसाममधील श्रीभूमी येथे घडली आहे. या भागात, कुशियारा नदी ही दोन्ही देशांची सीमा आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूंना १५० मीटरचा पट्टा नो-मेन्स लँड मानला जातो. तेथे कोणत्याही प्रकारचे मंदिर बांधण्यापूर्वी किंवा प्रवेश करण्यापूर्वी परवानगी आवश्यक आहे.
“अमर सोनार बांगला” हे गाणे रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये ब्रिटिशांनी बंगालच्या पहिल्या फाळणीदरम्यान लिहिले होते. त्यावेळी हे गाणे बंगालच्या एकतेचे आणि वसाहतवादी धोरणाच्या विरोधाचे प्रतीक बनले. १९११ मध्ये जेव्हा फाळणी रद्द करण्यात आली तेव्हा त्यामुळे लोकांमध्ये सामायिक ओळखीची भावना आणखी बळकट झाली.
भारताच्या १९४७ मधील फाळणीनंतर बंगालचा मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानमध्ये गेला, ज्याला पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखले जाऊ लागले. पूर्व पाकिस्तानातील बहुसंख्य जनता बंगाली भाषिक होती; मात्र पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी भाषिक नेतृत्वाचे वर्चस्व असल्याने असंतोष वाढत गेला. १९७१ मध्ये या असंतोषातूनच पूर्व पाकिस्तानने स्वातंत्र्य घोषित करून बांगलादेश या नव्या राष्ट्राची स्थापना केली. बांगलादेशने बंगाली ओळख आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून रवींद्रनाथ टागोर लिखित “अमर सोनार बांगला” हे गाणे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
Bangladesh’s national anthem “Amar Sonar Bangla” sung at a Congress meeting in Sribhumi, Assam – the same country that wants to separate the Northeast from India! Now it’s clear why Congress, for decades, allowed and encouraged illegal Miya infiltration into Assam – to change… pic.twitter.com/dJNizO8F13 — Ashok Singhal (@TheAshokSinghal) October 28, 2025






