रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Election) सत्ताधारी काँग्रेस व भाजपमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. आता महादेव सट्टा (Mahadev App) ऍपवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले. या ऍपवरून मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
केंद्र सरकारने निवडणूक निधी घेतला असावा. त्यामुळेच ते ऍप बंद करत नाही, असा आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे. तसेच भाजपच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस महादेव ऍपच्या माध्यमातून दाऊद आणि पाकिस्तानकडून पैसे मिळवत आहे. बघेल यांनी भाजपाच्या आरोपांना पलटवार करत महादेव अॅप बंद करणे हे केंद्र सरकारचे काम आहे, राज्य सरकारचे नाही, असे सांगितले.
केंद्र सरकारवर आरोप करत त्यांनी सरकार महादेव ऍप का बंद करत नाही, असा सवाल केला. त्यांनी त्यांच्याकडून निवडणूक निधी घेतला आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला. महादेव ऍप संपूर्ण देशात सुरू आहे. त्यात केवळ भाजपाचेच लोक सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. बघेल पुढे म्हणाले, केंद्र सरकार बेटिंग ऍपवर जीएसटी लावून पैसे वसूल करत आहे.






