दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशातील सर्व विरोधकांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आणि एनडीए आघाडीला जोरदार टक्कर दिली. यानंतर आता एनडीए आघाडी 400 पारचे ध्येय गाठणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हा मोदी मीडिया पोल
राहुल गांधी यांना माध्यमांनी दिल्लीमध्ये गाठले. यावेळी त्यांनी एक्झिट पोलमध्ये आलेल्या निकालावर प्रश्न विचारले यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी पहिल्यांद एक्झिट पोलबाबत आपले मत स्पष्ट केले. राहुल गांधी म्हणाले, याचे नाव एक्झिट पोल नाही तर त्याचे नाव मोदी मीडिया पोल आहे. हा मोदीजींचा कौल आहे. हा त्यांचा काल्पनिक कौल आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच राहुल गांधींना इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही सिद्ध मूसवालाचे गाणे ऐकले आहे… आम्हाला 295 जागा मिळत आहेत.” असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
कॉग्रेसचे ट्वीट
ये एग्जिट पोल नहीं है। ये ‘मोदी-मीडिया’ पोल है। INDIA गठबंधन की 295 सीटें आ रही हैं। : @RahulGandhi जी pic.twitter.com/alETKjG3SO — Congress (@INCIndia) June 2, 2024
[blurb content=””]
इंडिया आघाडीचा किती जागांचा अंदाज?
इंडिया आघाडीने एनडीए आघाडीला जोरदार चुरशीची लढत दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केले जात आहे. तसेच इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक देखील पार पडत आहे. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा केला होता. नेत्यांशी आणि जनतेत चर्चा झाल्याने इंडिया आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा मिळतील असे आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो,’ असे खर्गे देखील म्हणाले आहेत.






